उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये झालेल्या आढावा बैठकीत नगरविकास विभागाबाबतची नाराजी फडणवीस यांनी बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्य सरकार तीन पक्षाचं आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यसरकारमधील अशी काही उदाहरणं आहेत ज्यामध्ये मतभेद असल्याचं दबक्या आवाजात बोललं जाऊ लागलं आहे. शुक्रवारी सह्याद्री येथे झालेल्या आढावा बैठकीत एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते अशीही माहिती समोर आली आहे.
शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. त्यामुळे प्रशासनाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. अमृत 2.0 अंतर्गत राज्याला 9 हजार कोटी रुपयांचा हिस्सा, 2021 मध्ये सुरू झालेली योजना 2026 मध्ये संपणार आहे.
अशातच, अधिकाऱ्यांकडून योजनेसंदर्भात जलदगतीने प्रक्रिया होत नसल्याने मुख्यमंत्री नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांची नाराजी ही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात नसून ती या प्रकल्पे/योजना राबवण्याची जबाबदारी असलेल्या आणि त्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांविरोधात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलन आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यातच नगरविकास विभागाच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याने उभयतांमधील दुरावा वाढल्याची चर्चा आहे.