मुंबई : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सध्या तेथील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईतही पावसाने प्रचंड जोर पकडला. काही भागांमध्ये तब्बल ३०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. हा पाऊस विक्रमी ठरला असून यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काही भागांमध्ये पाण्याचा निचरा सुरू झाल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईची (Mumbai Rain) लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन सेवा मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. मात्र, आता परिस्थिती सुधारत असल्याने वाहतूक हळूहळू पूर्ववत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. ते मंगळवारी मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
“मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास संकट वाढणार”
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिला, तर मुंबईत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने प्रशासनाला तातडीने ४०० ते ५०० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. नदीच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, गेल्या काही तासांमध्ये पाणी काहीसे ओसरले आहे. मात्र हवामान खात्याने येत्या काही तासांत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारी व खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम चा पर्याय दिला आहे. याशिवाय आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार असल्याने त्यावेळी परिस्थिती कशी राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र में भारी बारिश के चलते कई जिलों में रेड व ऑरेंज अलर्ट, मीठी नदी में बढ़ते पानी का स्तर, गणेशोत्सव के अवसर पर विशेष ट्रेन चलाने के निर्णय समेत विभिन्न मुद्दों पर मीडिया से संवाद...
(मुंबई | 19-8-2025)#Maharashtra #Mumbai #Rain pic.twitter.com/PMUlEprfPG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2025
“राज्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर; NDRF-SDRF सज्ज"
राज्यातील वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि राज्य आपत्ती निवारण दल (SDRF) यांना पूर्णपणे सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील बहुतांश नद्या इशारा पातळीवर पोहोचल्या असून, काही नद्या या पातळीच्या वर गेल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेजारच्या राज्यांशी संपर्क ठेवण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग व्यवस्थापन योग्यरीत्या होत असून, विशेषतः हिपरगी धरणाचा विसर्ग वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, तेलंगणा सरकारशीही संपर्क साधला आहे. तथापि, काही कॅचमेंट क्षेत्रातील परिस्थिती पूर्णतः आपल्या नियंत्रणात नसली तरी त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रशासन प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण केली आहे. अशातच पवईतील फिल्टर पाडा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. पवई फुलेनगर ...
मुंबईत विक्रमी पाऊस ३०० मिमीपेक्षा जास्त; दर तीन तासांनी अलर्ट
मुंबईत झालेल्या पावसाने विक्रमी पातळी गाठली असून, काही भागांत तब्बल ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. हा पाऊस अतिवृष्टीपेक्षाही मोठा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्याचा परिणामही पावसाच्या परिस्थितीवर होताना दिसतो आहे. यासोबतच, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची तीव्रता वाढली आहे. तोपर्यंत अतिवृष्टी संभाव्य असल्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला गेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, शहरांमध्ये डिझाईन ‘नॉर्मल प्लस १०’ या पद्धतीने केलेले असते. मात्र, विक्रमी पावसामुळे अडथळे निर्माण होणे स्वाभाविक आहे. नागरिकांना वेळोवेळी अचूक माहिती मिळावी यासाठी प्रशासनाने दर तीन तासांनी अलर्ट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणत्या भागात किती पाऊस होईल याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
ग्रामीण भागातील पीडितांना तत्काळ मदतीचे आदेश
राज्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे अनेकांचे घरं कोसळली, जनावरे मृत्युमुखी पडली आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीवर तात्काळ उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार आणि आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी तातडीने पीडितांना मदत करू शकतील. याशिवाय, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. शेतीचे नुकसान झालेले आहे, मात्र त्याबाबतची मदत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दिली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.