श्रीमंत रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा संपन्न
मुंबई: इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले (historic sword of Shrimant Raghuji Bhosale) यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार पोहोचेल आणि त्यामुळे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला, हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत सेना साहिब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मुधोजी राजे भोसले, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार संजय उपाध्याय, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार संजय कुटे, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, संचालक मीनल जोगळेकर, संचालक डॉ.तेजस गर्गे, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नागपूरच्या भोसल्यांचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास असून, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, युनेस्कोचे १२ किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे, अशा विविध वारशांद्वारे आपण आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडले जातो आहोत. हा दैदिप्यमान इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे हे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मराठा साम्राज्याच्या खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हजारो ऐतिहासिक वस्तू परत मिळवण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर आपणही आपला वारसा परत आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीमंत रघुजी राजे भोसले यांची तलवार म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार
इंग्रजांच्या काळात लुटून नेलेल्या आपल्याच शौर्याच्या, पराक्रमाच्या, मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारी प्रथम रघुजी राजे भोसले यांची तलवार अखेर महाराष्ट्रात परत आली आहे. ही केवळ एक वस्तू नाही, तर आपल्या पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक आहे,” असे भावनिक उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी काढले.
मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर उभे राहून रघुजी राजे भोसले यांनी मराठा साम्राज्य बंगालपासून ओडिसा, तेलंगणापर्यंत विस्तारले, याची आठवण करून देताना शेलार म्हणाले, “ही तलवार परत मिळवणे म्हणजे केवळ शौर्याचे पुनरागमन नाही, तर सांस्कृतिक पुनर्जन्म आहे. उद्याच्या पिढ्यांना ही प्रेरणा देणारी ठरणार आहे."
ते पुढे म्हणाले, “छत्रपतींच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवून देणे असो, किंवा रघुजी राजे भोसले यांची तलवार परत आणणे असो, हीच खरी ‘विरासत से विकास तक’ची संकल्पना आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, शौर्य आणि गणेशोत्सवासारखे उत्सव जागतिक पातळीवर पोहोचवणे हा आमचा संकल्प आहे.”
यावेळी श्रीमंत रघुजी राजे भोसले यांचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "मराठ्यांचा दरारा" या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.