मुंबई: आज मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. यादरम्यान जय जवान आणि कोकणनगर दहीहंडी पथकाने दहा थर लावत विश्वविक्रम केला. इतकेच नव्हे तर इतर प्रतिष्ठित दही हंडी पथकांनी देखील विशेष कामगिरी करत दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचा उत्साह कायम ठेवला. यादरम्यान अनेकांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला. संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली आणि भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला दाखवून देणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर' ची दखल देखील यादरम्यान घेतली गेली. घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर आयोजित राम कदम यांनी आयोजित केलेली दहीहंडी ही ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याल सलाम करण्यासाठी उभारण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित सैन्य दलातील जवानांना भेटून संवाद साधला. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आ. राम कदम यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शहर व उपनगरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान त्यांनी घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील दहीहंडी उत्सवाला देखील हजेरी लावली होती, यादरम्यान त्यांनी "ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचीती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार काढले.
आमच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या पापांची 'हंडी' फोडली- मुख्यमंत्री
"श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त, मुंबईत भव्य दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे आणि घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांनी ऑपरेशन सिंदूरच्या सैनिकांना समर्पित दहीहंडीचे आयोजन केले आहे . ऑपरेशन सिंदूरमध्ये, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, आमच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या पापांची 'हंडी' फोडली आणि आज आमच्या सर्व सैनिकांचे कौतुक केले जात आहे," असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,“दहीहंडी उत्सवाला उपस्थित असलेल्या सैन्य दलातील जवानांना व त्यांच्या शौर्याला मी मनःपूर्वक सलाम करतो. सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून घाटकोपर येथील उत्सवाने जे कार्य केले आहे ते उल्लेखनीय आहे. गोविंदा पथकांनी उभारलेले थर सैन्य दलाच्या शौर्यासाठी अर्पण केले आहेत, ही एक प्रेरणादायी बाब आहे.”
त्यांच्या हस्ते माजी सैन्य अधिकारी आनंद तिवारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्याबद्दल चेतन शाह व राजेश भीमसरे यांचा देखील गौरव करण्यात आला.