मुंबई : वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला आज ऐतिहासिक वळण मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या. या सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या शतकभराच्या इतिहासाचा आढावा घेतला.“बीडीडी चाळींनी अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनांची साक्ष दिली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यातील चळवळींपासून ते विविध विचारधारांच्या निर्मितीपर्यंत, या चाळींनी महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींना दिशा दिली,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, या चाळींमध्ये अनेक मान्यवर व्यक्ती राहिल्या असून त्यांच्या नेतृत्वाला इथे एक वेगळा आयाम मिळाला.
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या भिंतींमध्ये दडलेल्या असंख्य कथा आणि कहाण्यांचा उल्लेख करत, १०० वर्षांचा हा वारसा जपून पुनर्विकासाच्या माध्यमातून रहिवाशांना आधुनिक आणि सुरक्षित घर देण्याचा संकल्प व्यक्त केला. सध्या चाळींचा बराचसा भाग पाडण्यात आला असून पुनर्विकासाची गती वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा सोहळा रहिवाशांसाठी आनंदाचा आणि स्वप्नपूर्तीचा क्षण ठरला असून, बीडीडी चाळींच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.
“या बीडीडी चाळीत अनेक कुटुंबांचे दु:ख आणि आनंद सामावलेले आहेत. इथल्या लोकांच्या जीवनात झालेली प्रगती, तीन-चार पिढ्यांचा सहवास, आणि मुंबईच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास या चाळींमध्ये दिसून येतो,” असे ते म्हणाले. फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या मागणीची पार्श्वभूमीही उलगडली. “बीडीडी चाळींचा पुनर्विकास झाला पाहिजे, अशी चर्चा अनेक वर्षांपासून होत होती. आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी येथे राहणाऱ्या पोलिसांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, यासाठी मोर्चा काढला होता. बीडीडी चाळीच्या अंगणात माझीही मोठी सभा झाली होती, ज्यात पोलिसांच्या हक्काच्या मागण्या मी मांडल्या होत्या,” अशी आठवण त्यांनी सांगितली. या भावनिक स्मरणातून मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळींचा वारसा आणि तिथल्या लोकांशी असलेली जुनी नाळ अधोरेखित केली, तसेच पुनर्विकास हा केवळ विकासाचा नव्हे तर न्यायाचा आणि सन्मानाचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितला स्वअनुभव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीतील रहिवाशांचा स्वतःचा अनुभव सांगताना तिथल्या हालअपेष्टांचा जिवंत चित्र उभं केलं. त्यांनी सांगितलं की, बीडीडी चाळीतील सभेनंतर काही रहिवाशांच्या घरांना भेट दिली असता, तिथे ३०, ४०, अगदी ५० वर्षांपासून राहत असलेल्या लोकांची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. छत कोसळण्याच्या स्थितीत होतं, एका छोट्याशा खोलीत पडदे लावून थोडी गोपनीयता राखली जात होती. नावाला चाळ असली तरी परिस्थिती झोपडपट्टीपेक्षा वाईट होती. अशा कठीण परिस्थितीतही लोक वर्षानुवर्षं राहत होते. फडणवीस म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार आलं आणि आता फक्त मागण्या करण्याचा नाही, तर त्या पूर्ण करण्याचा काळ आला आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निर्धाराने हाती घेतला आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातील अडथळ्यांवर भाष्य करताना स्पष्ट सांगितलं की, या प्रकल्पात अनेक वर्षांपासून गुंतागुंत होती. त्यांनी सांगितलं की, “या चाळींशी संबंधित जवळपास ९० वर्षांची लांबण लावलेली कायदेशीर प्रकरणं होती. अभ्यास करताना लक्षात आलं की, बीडीडी चाळीबद्दल बरंच बोललं गेलं, पण पुनर्विकास का होत नाही यामागचं कारण वेगळंच होतं. हा प्रकल्प नेहमीच कुठल्या तरी बिल्डरच्या अपेक्षेवर सोडून दिला जात असे. नवीन बिल्डर यायचा, आराखडे तयार व्हायचे, लोकांची संमती घ्यायची आणि त्यांना मोठमोठी स्वप्न दाखवायची. मात्र प्रत्यक्षात काम काही सुरू व्हायचं नाही. आतापर्यंत चार-पाच आराखडे तयार झाले, पण एकही पूर्णत्वास गेला नाही. यामागचं कारण म्हणजे बिल्डरला लोकांच्या सोयीपेक्षा स्वतःला किती विक्रीयोग्य (सेलेबल) जागा मिळणार याचाच जास्त विचार होता.”