शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन
जम्मू आणि काश्मीर: पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यादरम्यान त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या हल्ल्यानंतर आदिलच्या बलिदानाची दखल घेऊन आपल्या कुटुंबियांना मदत केल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. शिंदे काश्मीर दौऱ्यावर असताना ही भेट झाली, यादरम्यान शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन देण्यात आले.
पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादी भारतीय नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालत होते. त्याचवेळी घोडेवाला म्हणून काम करणाऱ्या सय्यद आदिल हुसैन शाहने त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्यासोबत आलेल्या काही पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतवाद्यांनी त्याचे तोंड बंद करण्यासाठी त्यालाही गोळ्या घालून ठार केले. त्याने दाखवलेल्या या धाडसाची देशभर चर्चा झाली.
पर्यटकांचा जीव वाचवता वाचवता त्याचा जीव गेल्याने सय्यद कुटुंबातील कमावता हात कायमचा हिरावून घेतला गेला होता. अखेर त्याने दाखवलेल्या धाडसाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी पाठवून त्यांना पाच लाखांची मदत देऊ केली होती. या मदतीची जाण ठेवून त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना शिंदे यांनी, आपण आपला मुलगा या हल्ल्यात गमावला असून त्यापुढे आम्ही केलेली मदत ही नगण्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ही मदत देऊन आपण देशवासीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा असून यापुढेही आपल्याला लागेल ती मदत नक्की करू असे त्यांना वचन दिले.
तसेच पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी केंद्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील पर्यटकांनी पुन्हा काश्मीरमध्ये यावे आणि ही जागा पुन्हापूर्वीसारखी नंदनवन व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासन इथे जागा घेऊन सुसज्ज असे महाराष्ट्र भवन उभारणार असून त्याद्वारे जास्तीत जास्त पर्यटकांचे पाय पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरकडे वळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच येथील हॉटेलवाले, घोडेवाले, टुरिस्ट गाईड, छोटे मोठे दुकानदार यांना पुन्हा एकदा हक्काचा रोजगार मिळेल असे दिवस आणण्यासाठी सारे एकत्र राहून पुन्हा प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.