तडजोड करणार नसल्याची पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
- शेतकरी, पशुपालक, मच्छीमारांच्या हिताला प्राधान्य
- शेतकऱ्यांची ताकद देशाच्या प्रगतीचा आधार
- शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठी किंमत मोजण्याची तयारी
नवी दिल्ली : भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या, मच्छीमारांच्या हितांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. मला जाणीव आहे की यासाठी मला मोठी किंमत मोजावी लागेल; परंतु मी त्यासाठी तयार आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी दिल्लीतील एमएस स्वामिनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वामिनाथन यांना समर्पित एक स्मारक, नाणे व शतकोत्तर स्मारक टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टॅरिफ लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.
मोदी यांनी ट्रम्प यांच्या अरेरावीला संयमी उत्तर दिले आहे. मोदी यांची ही टिप्पणी थेट वॉशिंग्टनसाठी संदेश असल्याचे मानले जात आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याच्या उद्दिष्टांवर आम्ही सतत काम करत आहोत. सरकारने शेतकरी ताकदीला देशाच्या प्रगतीचा एक आधार मानले आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांत जी धोरणे तयार करण्यात आली ती केवळ मदत नव्हती, तर शेतकऱ्यांचा विश्वास वाढवण्याचा आमचा प्रयत्न होता.
पीएम किसान सन्मान निधीद्वारे मिळत असलेल्या थेट मदतीमुळे छोट्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पीएम कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाशी संबंधित समस्या सोडवल्या आहेत. १० हजार एफपीओच्या निर्मितीमुळे छोट्या शेतकऱ्यांची संघटित शक्ती वाढली आहे. सहकारी व बचत गटांना आर्थिक मदत मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाली असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
‘स्वामिनाथन यांनी शेतकऱ्यांना शेती पद्धतीत बदल करण्यासाठी प्रेरित केले’
डॉ. स्वामिनाथन यांनी भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी अभियन राबवले. शेतीमध्ये केमिकलचा वाढता वापर आणि मोनो-कल्चर फार्मिंगच्या धोक्यांबद्दल ते शेतकऱ्यांना सतत जागरूक करत राहिले. ते केवळ संशोधन करत नव्हते तर त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या पद्धतीत बदल करण्यासाठी प्रेरित केले. आजही त्यांचा दृष्टिकोन आणि विचार भारताच्या कृषी क्षेत्रात सगळीकडे दिसून येतो. ते खरोखरच भारतमातेचे रत्न होते, असे ते म्हणाले.