Thursday, March 26, 2026

Ajit Pawar : "अजित दादांची मिश्किल टिपणी: ‘मी जेवायला आलो तर बिल घेऊ नका’… असं का म्हणाले अजित दादा?

Ajit Pawar :

पुणे : पुण्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चाकण आणि परिसरातील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली. सकाळी पहाटे ५:४५ वाजताच त्यांनी या भागाचा दौरा सुरू केला. या पाहणीदरम्यान त्यांनी नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी तसेच पालिकेचे आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. चाकण आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा आणि औद्योगिक विकासाचा विचार करता, या भागात महानगरपालिका स्थापन करावी लागणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासाठी निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. यानंतर पुणे-नाशिक मार्गासाठी एलीवेटेड रोड उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. "हे केल्याशिवाय वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होणार नाही," असे सांगत अजित पवार यांनी या प्रकल्पांना तातडीने गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

चाकण दौऱ्यादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिकांच्या समस्या आणि सहनशीलतेचा विशेष उल्लेख केला. "तुम्ही बराच काळ वाहतूक कोंडी आणि इतर अडचणी सहन केल्या आहेत. तुमची सहनशीलता कौतुकास्पद आहे. पण आता या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढूया," असे ते म्हणाले. अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, चाकण आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिक विस्तारामुळे येथे महानगरपालिका स्थापन करणे अत्यावश्यक झाले आहे. "काहींना हे आवडेल किंवा नाही, पण हे पाऊल उचलणे भाग आहे," असेही त्यांनी अधोरेखित केले. याचवेळी त्यांनी एक मोठी घोषणा करत सांगितले की, पुणे जिल्ह्यात लवकरच तीन नवीन महापालिका स्थापन केल्या जाणार आहेत. यामुळे पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन अधिक सक्षम होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी चाकण आणि हिंजवडीसह मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागांच्या विकासाविषयी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या भागांत स्वतंत्र महापालिका स्थापन करावी लागणार आहे. यामुळे नागरिकांना अधिक सुविधा मिळतील आणि स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भाषणादरम्यान अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या मिश्किल शैलीत एक किस्सा सांगून उपस्थितांचे हसू पिकवले. त्यांनी सांगितले की, दौऱ्यादरम्यान एका हॉटेलमध्ये ते थांबले असता हॉटेल मालकांनी त्यांना नाश्ता करण्यासाठी विनंती केली. मात्र वेळेअभावी त्यांनी ती ऑफर नाकारली. पुढच्या वेळी आल्यावर नक्की जेवण करेन, पण तेंव्हा मात्र माझं बिल घेऊ नका, अशी मिश्किल टिपणी करत अजित पवारांनी वातावरण हलकंफुलकं केलं. या घोषणेमुळे पुणे जिल्ह्यातील शहरी विकासाला नवा वेग मिळण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर या निर्णयावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

राजकारण आणि व्यवसाय नेहमी स्वतंत्र ठेवावेत : अजित पवार

चाकण दौऱ्यादरम्यानच्या भाषणात अजित पवारांनी आपली मिश्किल टिपणी केल्यानंतर लगेचच गंभीर सूर लावत एक स्पष्ट संदेश दिला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “राजकारण आणि व्यवसाय नेहमी स्वतंत्र ठेवावेत. हॉटेलमध्ये कोणताही ग्राहक आला, मग तो नेता असो वा सामान्य नागरिक, त्याचे बिल नक्की घ्यावे. असं केलं नाही तर शेवटी हॉटेलचा तोटा होईल, आणि दिवाळं निघून हॉटेल बंद करण्याची वेळ येईल.” भाषणाच्या दरम्यान प्रेक्षकांमध्ये कोणीतरी टिप्पणी केल्यावर अजित पवारांचा नेहमीचा थेट आणि कडक अंदाजही पाहायला मिळाला. त्यांनी त्या व्यक्तीला उद्देशून विचारले, “आम्ही काय बिनडोक आहोत का? तुम्हालाच सगळं कळतं का?” अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांसमोर त्यांना चांगलेच सुनावले. त्यांच्या या रोखठोक शैलीमुळे वातावरणात क्षणभर तणाव निर्माण झाला, पण त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये उत्सुकताही वाढली. या प्रसंगाने अजित पवारांची मिश्किल पण थेट मुद्दा मांडणारी शैली पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली.

Comments
Add Comment