Uttarkashi : धरालीतील 'कल्प केदार' मंदिराची दुर्दैवी पुनरावृत्ती; ८० वर्षांपूर्वी सापडले, आज पुन्हा गडप

धरालीचे प्राचीन शिवमंदिर ढगफुटीच्या तडाख्यात


उत्तरकाशी : उत्तराखंडमधील

">उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीमुळे भीषण नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १०० नागरिक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेत लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालून युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. आतापर्यंत १३० जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरे, हॉटेल्स, दुकाने आणि एक प्राचीन मंदिर 'कल्प केदार' हे ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. या मंदिराला स्थानिक आणि भाविकांमध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. सध्या मुसळधार पावसामुळे मदतकार्याला अडथळा येत असला, तरी यंत्रणांकडून रात्रंदिवस बचावमोहीम सुरूच आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी ड्रोन, श्वानपथक आणि यंत्रसामग्रीचा वापर सुरू आहे.



'कल्प केदार' मंदिराची केदारनाथसारखी कथा


धराली गावात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीत ढिगाऱ्याखाली गेलेल्या ‘कल्प केदार’ मंदिराबाबत स्थानिकांमध्ये धार्मिक भावनांशी निगडित एक विशेष कथा प्रचलित आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, हे मंदिर अतिशय प्राचीन असून, त्याची वास्तुकला केदारनाथ धामप्रमाणेच आहे. याच कारणामुळे या मंदिराला ‘कल्प केदार’ असे नाव देण्यात आले आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, जसे केदारनाथ धाम हे मंदिर वर्षानुवर्षे बर्फाच्या थराखाली गाडले गेले होते, त्याचप्रमाणे कल्प केदार मंदिर देखील जमिनीखाली गाडले गेले होते. त्यानंतर काळानुसार या मंदिराचा काही भाग पुन्हा समोर आला आणि स्थानिकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले.
या पौराणिक संदर्भामुळेच, मंदिर ढिगाऱ्याखाली गेल्याने गावकरी अत्यंत भावनिक अवस्थेत आहेत. मंदिराबाबतचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन लक्षात घेता, अनेक भाविक पुन्हा एकदा या मंदिराच्या पुनरुत्थानाची आशा बाळगत आहेत.



१९४५ मध्ये उघड झाला ‘कल्प केदार’चा इतिहास


धरालीतील ‘कल्प केदार’ मंदिराचा इतिहास १९४५ सालापासून उजेडात आला. माध्यमांतील वृत्तांनुसार, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात या मंदिरात पूजाअर्चा सुरू झाली होती, मात्र हे मंदिर पूर्णपणे उघड झालं ते १९४५ मध्ये. त्या काळात खीर गंगा नदीचा प्रवाह अचानक कमी झाला, आणि स्थानिकांना नदीकाठावर मंदिराच्या शिखरासारखी रचना दिसली. त्या जागेचं उत्खनन करण्यात आलं असता, अनेक फूट जमिनीतून प्राचीन शिवमंदिर बाहेर आलं. विशेष म्हणजे, या मंदिराची वास्तूरचना केदारनाथ मंदिराशी मिळती-जुळती होती. उत्खननानंतरही मंदिर जमिनीच्या पातळीखालीच राहिलं होतं. त्यामुळे भाविकांना मंदिरात खाली उतरून पूजा करावी लागत असे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, खीरगंगेचं पाणी अनेकदा मंदिराच्या गर्भगृहात, थेट शिवलिंगापर्यंत पोहोचत असे, ही बाबही श्रद्धेचा विषय बनली होती. मात्र, आता ढगफुटीच्या घटनेमुळे, हे मंदिर पुन्हा एकदा मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये शोक आणि चिंता व्यक्त केली जात आहे. इतिहासात एकदा बाहेर आलेलं हे पवित्र मंदिर, आता पुन्हा जमिनीत दडपलं गेलं आहे.





१८१६ मध्ये इंग्रज प्रवाशाचा उल्लेख, १८६९ मध्ये पहिली छायाचित्रे


धराली गावातील ‘कल्प केदार’ मंदिराचा उल्लेख इतिहासात तब्बल दोन शतकांपूर्वी सापडतो. १८१६ मध्ये गंगा-भागीरथीच्या उगमाचा शोध घेणारे इंग्रज प्रवासी जेम्स विल्यम फ्रेझर यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात धराली येथील मंदिरांमध्ये विश्रांती घेतल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर, १८६९ मध्ये इंग्रज छायाचित्रकार आणि संशोधक सॅम्युअल ब्राउन यांनी धरालीतील तीन प्राचीन मंदिरांचे छायाचित्रे काढली, जी सध्या भारतीय पुरातत्व विभागाकडे सुरक्षित आहेत. ही छायाचित्रे मंदिराच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा ठोस पुरावा मानली जातात. मंदिराच्या स्थापनेविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. काही लोक म्हणतात की, या शिवमंदिराची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली होती, तर काहींचा विश्वास आहे की, केदारनाथला येताना पांडवांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. या सर्व ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय संदर्भांमुळे, ‘कल्प केदार’ मंदिर हे फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.


Tags
UttarakhandUttarkashikalp kedarकल्प केदार
Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन