Uttarkashi : उत्तरकाशीत पूर आपत्तीची झळ अधिक तीव्र; पुराच्या तडाख्यात ६० बेपत्ता, मदतकार्यासाठी शर्यत सुरू

उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला. अचानक पुरामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, आपत्तीनंतरच्या दुसऱ्या दिवशी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ही घटना दुपारी १:४५ ला घडली आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. गंगोत्री पर्वतातून वाहणाऱ्या खीर गंगा नदीला मोठा पूर आला. वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबतच मोठा ढिगारा देखील आला आणि ३४ मिनिटांमध्येच थरावी गावात काहीच राहिले नाही. या घटनेत ४ जणांचा जीव गेला, अद्याप ६० हून अधिक नागरिक बेपत्ता असून, मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.



रात्रभर सुरू राहिले मदतकार्य



सेना अधिकारी कर्नल हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्यात लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि सीमा रस्ते संघटना यांचे जवान गुंतले आहेत. रात्रभर मदतकार्य सुरू राहिले असून, ट्रॅकर डॉग्ज, ड्रोन, मोठ्या यंत्रसामग्री आणि अतिरिक्त लष्करी तुकड्या हर्षिल भागात दाखल झाल्या आहेत. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टर्समार्फत अडकलेल्या नागरिकांसाठी अन्न, औषधं आणि आवश्यक साहित्य पोहोचवले जात आहे. अत्यावश्यक परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतरही करण्यात येत आहे.



धारालीत सर्वाधिक नुकसान, तिथेच केंद्रबिंदू


धाराली हे गाव खीर गंगा (उपनदी) आणि भागीरथी नदीच्या संगमावर वसलेले आहे. या ठिकाणी अचानक पूर आणि जमिनीचा भूस्खलन झाल्याने मोठ्या प्रमाणावर हानी झाली. नागरिकांना उंच ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, या भागात कोणताही ढगफुटीचा इशारा नव्हता. वाडिया हिमालय भूशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, ग्लेशिअरवरील तलाव फुटल्यामुळे पूर आला असण्याची शक्यता आहे. मात्र, घटनास्थळी पाहणी केल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही.



टापोवनप्रमाणेच मोठा धोका?


धारालीतील ही घटना २०२१ मधील चमोली जिल्ह्यातील तपोवन पुराची आठवण करून देणारी आहे. त्यावेळी देखील पूरामुळे जलविद्युत प्रकल्प उध्वस्त झाला होता आणि २०० पेक्षा अधिक लोक मृत किंवा बेपत्ता झाले होते. त्या वेळी बचावकार्य आठवड्यांपर्यंत चालले होते. सध्या धाराली येथे सध्या २५० हून अधिक जवान बचावकार्य करत असून, सीमा रस्ते संघटना आणि आयटीबीपीचे आणखी २०० जवान तिथे दाखल होणार आहेत. धाराली परिसरात वीज आणि मोबाइल नेटवर्क ठप्प असल्यामुळे मदतकार्यास अडथळा निर्माण झाला आहे. सॅटेलाईट फोन पाठवण्यात आले असून, दूरसंचार सेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहेत. अधिकृत माहितीप्रमाणे, बाराली गावातील ३२ वर्षीय आकाश पवार याचा मृतदेह आढळून आला आहे.



हेलिपॅड कार्यरत, निवारा केंद्र सुरू


झाला आणि चिन्यालीसैंन इथल्या ठिकाणी हेलिपॅड कार्यान्वित करण्यात आले असून, जिल्हा प्रशासन हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नदीकाठच्या भागांतील नागरिकांसाठी विविध ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आले आहेत. यामध्ये किर्ती इंटर कॉलेज, GIC कॉलेज, झाला/हर्षिल आणि गढवाल मंडळ यांचा समावेश आहे.



धोक्याची पातळी ओलांडलेल्या नद्या, ६ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल



  • अलकनंदा नदी (रुद्रप्रयाग) – ६२७.६ मीटर (धोक्याची पातळी: ६२७ मीटर)

  • मंदाकिनी नदी (गौरीकुंड) – १९७६.८ मीटर (१९७७.३५ मीटरच्या उच्चतम पातळीच्या अगदी जवळ)

  • मंदाकिनी नदी (रुद्रप्रयाग) – ६२६.३ मीटर (धोक्याची पातळी: ६२६ मीटर)

  • भागीरथी नदी (देवप्रयाग) – ४६४.३ मीटर (धोक्याची पातळी: ४६३ मीटर)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संवाद




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवर चर्चा करत बचावकार्याची माहिती घेतली. धामी यांनी सांगितले की, सतत पडणाऱ्या पावसामुळे मदतीत अडथळे येत असले तरी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात