मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून हा कबूतरखाना बंद करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने ताडपत्री टाकून कबुतरखाना पूर्णपणे बंद केला. ज्यामुळे आंदोलककर्ते भडकले आणि त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेत कबुतर खान्याची ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला. यात महिलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट देखील झाली. हा राडा व्हिडिओ आणि फोटोच्या मध्यमातून सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आज सकाळपासून दादर येथील कबुतरखाना वाचवण्यासाठी जैन समाजाने केलेल्या राड्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणले, "जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालावी लागेल, यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल." देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
"एकीकडे धार्मिक आस्था आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्य देखील आहे": देवेंद्र फडणवीस
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपली प्रतिकिया दिली. दादरच्या कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकीकडे धार्मिक आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यावर काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहेत. ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे, तीदेखील खंडित होणार नाही आणि आरोग्याचेही प्रश्न निर्माण होणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेने जी ताडपत्री टाकली होती. ती जैन समूदायाच्या आंदोलकांनी काढली, त्याचे बांबूही तोडण्यात आले. त्यानंतर हा कबुतरखाना न्यायालयाच्या विरोधात जाऊन पुन्हा सुरू करण्यात आला आहे.