पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद
कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे हलवण्याबाबत मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरले आहेत. पेटा या प्राणीमित्र संघटनेने यासंदर्भातील सत्यपरिस्थिती एका अहवालामार्फत नमूद केली आहे. महादेवीला झालेल्या दुखापती व मानसिक अवस्था आणि तिचा होत असलेला अवैध वापर यामध्ये सांगण्यात आला आहे.
या अहवालात नमूद केल्यानुसार, पेटा या विख्यात प्राणिमित्र संघटनेने सन २०२२ पासून या हत्तिणीची माहिती घेतली होती. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पेटाने वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे यासंदर्भात विस्तृत तक्रार केली. या तक्रारीसोबत या हत्तिणीची अवस्था दाखविणारी छायाचित्रे, पशुवैद्यक तज्ज्ञांचे अहवाल, तिला झालेल्या शारीरिक दुखापती आणि तिची मानसिक अवस्था तसेच तिचा व्यापारी आणि अवैध वापर होत असल्याबाबत तपशील आणि पुरावे देखील जोडले होते.
या हत्तिणीला २०१२ पासून ते २०२३ पर्यंत तेरा वेळा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये वनखात्याच्या परवानगीशिवाय नेण्यात आले होते. ८ जानेवारी २०२३ रोजी तेलंगणा वनखात्याने यासंदर्भात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ४८ ए आणि ५४ नुसार, वन्यजीव गुन्हा नोंदवला. सार्वजनिक मिरवणुकीत या हत्तिणीला अवैधरीत्या सहभागी केल्याबद्दल हत्तीणीचा माहूत इस्माईल याच्याविरुद्धही हा गुन्हा नोंदवण्यात आला. नंतर यासंदर्भात २५ हजार रुपये भरल्यानंतर आणि गुन्हा कबूल केल्यानंतर या गुन्ह्यात तडजोड झाली आणि हत्तिणीचा ताबा कोल्हापूर येथील स्थानिक माहुताकडे सोपवण्यात आला.
या हत्तिणीचा वापर व्यापारी तत्त्वावर करण्यात येत होता असेही अहवालातून आणि छायाचित्रांमधून स्पष्ट करण्यात आले. मोहरमसह अन्य सार्वजनिक मिरवणुकांमध्ये तिला सहभागी केले होते. तसेच भीक मागण्यासाठी देखील तिचा वापर करण्यात आला होता. तिच्या सोंडेवर लहान मुलांना बसवण्यात येत होते. बंदी घातलेल्या धातूच्या अंकुशाचा वापर करून तिच्यावर नियंत्रण ठेवले जात होते. या हत्तिणीची पूजा करण्याची संधी मठातर्फे बोली लावून विकली जात होती. त्यामुळे या हत्तिणीचा वापर पैशांसाठीही केला जात होता हे दिसते.
१२ ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक पोलिसांनी लिहिलेल्या पत्रानुसार सरकारी पशुवैद्यक डॉक्टरांनी या हत्तीणीची तपासणी केली आणि तिच्या शरीरावर असलेल्या खुल्या जखमा, तिच्या पायाच्या तळव्याची झालेली झीज, तिचा पांगळेपणा तसेच तिची बिघडलेली मानसिक अवस्था यांचा अहवाल दिला. २० ऑक्टोबर २०२३ रोजी ‘ॲनिमल राहत’ या संघटनेचे डॉक्टर राकेश चित्तोरा यांनी सविस्तर वैद्यकीय अहवाल देऊन या हत्तीणीला रुग्णालयात ठेऊन तिची नीट सुश्रुषा आणि पुनर्वसन व्हावे असे सांगितले. हत्तींची काळजी घेण्याबाबतचे प्राथमिक ज्ञानही तिच्या माहुताला नाही, असेही त्यांनी अहवालात नमूद केले होते.
या कागदपत्रांच्या आधारे उच्चस्तरीय समितीने याबाबत चौकशी सुरू केली. मात्र सुरुवातीला त्यांनी संबंधित मठाला हत्तिणीची अवस्था सुधारण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला. जून आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये या हत्तिणीची पुन्हा पाहणी आणि तपासणी केल्यानंतर असे आढळले की, तिच्या अवस्थेत केवळ वरवरच्याच सुधारणा झाल्या आहेत. मात्र तिच्यावरील उपचार आणि तिचे हित याबाबत अजूनही गंभीर कमतरता आहे, असेही त्यात आढळले.
२७ डिसेंबर २०२४ रोजी उच्चस्तरीय समितीने आदेश देऊन या हत्तिणीला जामनगरच्या आरकेटीईडब्ल्यूटीमध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश दिला. येथे प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास, पशुवैद्यक तज्ज्ञांमार्फत काळजी, कळपातील आपल्या जातीच्या अन्य प्राण्यांमध्ये मिसळण्याची संधी तसेच विशेष प्रशिक्षित माहुत आदी सोयीसुविधा आहेत.
या हत्तिणीला आपल्याकडे आणण्यात किंवा तशी मागणी करण्यात वनताराने काहीही भूमिका बजावली नाही. हत्तींचे हित तसेच त्यांची काळजी घेण्यातील वनताराची क्षमता आणि त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन उच्चस्तरीय समितीनेच या हत्तिणीला वनतारामध्ये पाठवण्यास सांगितले होते. मठाने या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र मठाची याचिका सविस्तर सुनावणीनंतर १६ जुलै २०२५ रोजी फेटाळण्यात आली.
उच्चस्तरीय समितीचा निर्णय वैध असल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि धार्मिक प्रथा परंपरांपेक्षाही हत्तीणीचे हित महत्त्वाचे आहे, या मुद्यास न्यायालयाने प्राधान्य दिले. सर्वोच्च न्यायालयाने देखील २८ जुलै २०२५ रोजी उच्च न्यायालयाचा हा निर्णय वैध ठरवला आणि दोन आठवड्यात या हत्तिणीला वनतारामध्ये हलवावे असा आदेश दिला. आता या आदेशाची पूर्तता कशाप्रकारे करण्यात आली हे पाहण्याकरता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले आहे.