पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया पोस्टमुळे उसळलेल्या जातीय हिंसाचार (communal violence in Pune) संदर्भात पोलिसांनी आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांविरुद्ध पाच एफआयआर दाखल केले आहेत. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांप्रकरणी १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी दुपारी एका तरुणाने सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर गावात जातीय तणाव पसरला. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी तोडफोड करायला सुरुवात केली, दरम्यान अनेक वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. घटनेदरम्यान, हल्लेखोरांनी मोटारसायकल, दोन कार, धार्मिक स्थळ आणि बेकरीचे नुकसान केले आणि आग लावली. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गावात शांतता प्रस्थापित झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा आणि लाठीचार्ज चा वापर करावा लागला.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, यवत पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत हिंसाचाराशी संबंधित पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी चार गुन्हे हिंसाचार, जाळपोळ आणि मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या ५०० हून अधिक लोकांविरुद्ध दाखल आहेत. त्यापैकी १०० हून अधिक जणांची ओळख पटली आहे आणि १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे."
धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्याने शेअर केलेला मजकूर दुसऱ्या राज्यातील एका घटनेवर आधारित होता.
कलम १४४ आणि एसआरपीएफ तैनात
पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल म्हणाले की, सुरुवातीच्या तपासात कोणताही पूर्वनियोजित कट रचल्याचे दिसून आले नाही. "गावातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मोठ्या संख्येने पोलिस दल आणि राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) तैनात करण्यात आले आहे. बीएनएसच्या कलम १४४ आणि बीएनएसएसच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत." असे त्यांनी पुढे माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार म्हणाले, "गावावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे आणि सोशल मीडियावरील क्रियाकलापांवरही विशेष लक्ष दिले जात आहे."
"कठोर कारवाई केली जाईल": मुख्यमंत्री
पुणे दौंड दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनेचा निषेध करत म्हणाले, "मध्य प्रदेशातील एका घटनेशी संबंधित एका हिंदू पुजारीबद्दल एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केली, ज्यामुळे गावात संताप निर्माण झाला. काही लोक जाणूनबुजून अशा पोस्ट करून तणाव पसरवू इच्छितात. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गावाला भेट दिली आणि पोस्ट टाकणारा तरुण नांदेडचा रहिवासी आणि रोजंदारीवर काम करणारा असल्याचे सांगितले जाते.