नवी दिल्ली : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर गरमागरम चर्चा सुरु झाली आहे. ही सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळ घातलाय. तर या मॅरेथॉन चर्चेला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यात जोरदार रणधुमाळी सुरु आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला भारतानं प्रत्युत्तर दिलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभेत काय- काय होणार? चला, जाणून घेऊया या लेखातून...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा प्रचंड गोंधळात गेला. त्यातच जगाने ज्या ऑपरेशन सिंदूरची दखल घेतली त्यावर विरोधकांनी संसदेत गदारोळ घातलाय. त्यामुळे आज संसदेत पहलगाम ते ऑपरेशन सिंदूरवर गरमागरम चर्चा सुरु आहे. या ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. २२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने २६ जणांचा बळी घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशनने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या दाव्यांमुळे विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केलीय. आज लोकसभेत या ऑपरेशन सिंदूरवर १६ तासांची चर्चा होणार आहे आणि उद्या राज्यसभेतही तितक्याच वेळ चर्चेसाठी दिला जाणार आहे.
पावसाळी अधिवेशनात कोण मारणार बाजी? नवी दिल्ली : आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. विरोधक मोदी सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. ...
ऑपरेशन सिंदूर हा भारताचा दहशतवादाविरुद्धचा ठोस संदेश होता. २२ मिनिटांच्या या ऑपरेशनने ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला 'विजय उत्सव' म्हटलं, तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याला भारताच्या स्वदेशी संरक्षण सामर्थ्याचा पुरावा ठरवलं. आज राजनाथ सिंह यांनी लोकसभेत चर्चेची सुरुवात केली आहे. गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भाजपा खासदार अनुराग ठाकुर, निशिकांत दुबे यांच्यासह टीडीपीचे लावू श्रीकृष्ण देवरायलू आणि जीएम हरीश बालायोगीही आपली भूमिका मांडतील.ऑपरेशन सिंदूरने भारतात दहशतवादाविरुद्ध आपली 'झीरो टॉलरन्स' नीती जगाला दाखवली, मात्र विरोधकांचे प्रश्न आणि आक्षेप हे राजकीय डावपेच आहेत, आम्ही संसदेत सत्य मांडू, अशी भाजपाने भूमिका घेतलीय. विरोधकांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या दाव्यांचा हवाला देत भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ट्रम्प यांनी २५ वेळा युद्धविरामाचा दावा केला, पण भारताला आंतरराष्ट्रीय पाठिंबा का मिळाला नाही, असा राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केलाय. पहलगाम हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे. सरकारने याची जबाबदारी का स्वीकारली नाही? आणि ट्रम्प यांच्या दाव्यांवर पंतप्रधान गप्प का आहेत? असे प्रश्न विरोधक उपस्थित करू शकतात.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चेसाठी १६ तासांचा वेळ निश्चित झालाय. काँग्रेस नेते शशी थरूर यांना बोलण्याची संधी मिळेल का, याबाबत उत्सुकता आहे, कारण त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं होतं. त्यामुळे पक्षात मतभेद निर्माण झाले होते. तर दुसरीकडे सदनाचं कामकाज बाधित करू नका, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलंय. त्याचबरोबर जेव्हा रावणाने लक्ष्मण रेखा ओलांडली, तेव्हा लंका जळाली आणि जेव्हा पाकिस्तानने भारताने आखलेली लाल रेषा ओलांडली, तेव्हा दहशतवादी छावण्या आगीत भस्मसात झाल्या अशी एक्सपोस्टही रिजिजू यांनी केलीय. ऑपरेशन सिंदूरवर संसदेत १६ तासांची रणधुमाळी होणार आहे. मोदी सरकार आपल्या सैन्याच्या पराक्रमाचा डंका वाजवेल, तर विरोधक गुप्तचरांचं अपयश आणि परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करेल. ही चर्चा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कशी ठरेल, ऑपरेशन सिंदूरची बाजू सरकार कशी मांडणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.