मनमाड : मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय आधीच रेफर हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध होत असतानाच याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली १०८ रुग्णवाहिका तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील एकही १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने मनमाड शहरातील एका गरीब रुग्णाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेबाबत शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोग्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अजून किती बळी घेतल्यानंतर आम्हाला आरोग्य सुविधा मिळेल असा संतप्त सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.
गेल्या महिन्याभरात १०८ रुग्णवाहिका वेळेत मिळू शकल्याने किमान सात ते आठ जणांनी आपले प्राण गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था म्हणणाऱ्या महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी माफक अपेक्षा मनमाड शहरातील जनतेकडून करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : देशात प्रथमच हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची यशस्वी ट्रायल पार पडली आणि भारतीय रेल्वेने अक्षरशः इतिहास रचला. रेल्वे सेवेत आता क्रांतीकारक ...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावरकर नगर, हुडको येथील रहिवासी चंद्रमोहन ताराचंद जाधव यांची अचानक तब्येत खराब झाली. त्यांना तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉ. हेमंत काळे यांनी तपासणी करून सांगितले की, त्यांना सामान्य मेंदूचा झटका आला असून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवणे आवश्यक आहे. यासाठी दुपारी १२:०० वाजता १०८ रुग्णवाहिका सेवेला संपर्क साधण्यात आला. मात्र, १०८ रुग्णवाहिका सेवेला फोन लागत नाही एक फोन लागला तो जवळपास अर्धा तास सुरू ठेवण्यात आला त्यानंतर कट झाला. मात्र त्यानंतर अनुक्रमे दोन, तीन, चार कॉल करण्यात आले. मात्र तेही कट करण्यात आले. यानंतर सायंकाळी पाच नंतर फोन लागला व नांदगाव येथून १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. मात्र ती रुग्णवाहिका येण्यासाठी देखील साडेसहा वाजले.
यानंतर जाधव यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराला उशीर झाल्याने रात्री त्यांचे निधन झाले. १०८ या रुग्णवाहिकेच्या निष्काळजीपणामुळे एका गरीब कुटुंबातील कमावते व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले असून याआधीच मनमाड उपजिल्हा रुग्णालय हे रेफर हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी ताप, सर्दी, खोकला सोडला तर कोणत्याही उपचारासाठी मालेगाव, नाशिक किंवा धुळे येथे रेफर करण्यात येते.
मुळात या रुग्णालयाला गेल्या वर्षभरापासून मुख्य अधीक्षक देखील उपलब्ध नाही. यामुळे मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सेवा ही रामभरोसे आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे योग तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी मागील आठवड्यातच अधीक्षक यांच्या बंद कार्यालयाला निवेदन चिटकवून आम्हाला कोणी डॉक्टर देता का डॉक्टर, अशी विनंती केली होती. या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, गेल्या एका महिन्यात अशाच कारणांमुळे मनमाड परिसरातील ७ ते ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, १०८ रुग्णवाहिका सेवेच्या अपयशामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.
१०८ रुग्णवाहिका सेवा निष्क्रिय सेवा, कारवाईची मागणी!
आमच्या प्रभागातील गरीब कुटुंबातील सदरील व्यक्ती होती. त्यांच्या मुलाला घेऊन आम्ही मनमाडला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरानी तात्काळ नाशिकला हलवण्यास सांगितले. मात्र १०८ ही रुग्णवाहिका ६ तासापेक्षा जास्त काळ उपलब्धच झाली नाही. उपचारासाठी विलंब झाल्याने त्यांचा प्राण गेला आणि याला फक्त आणि फक्त १०८ हीच रुग्णवाहिका सेवा जबाबदार आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करून या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत करावी, अन्यथा आंदोलन करु. - परेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते.