मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा नव्या वादात अडकली आहे. यावेळी तिने मुद्दा घेतलाय तो मराठी भाषावादाचा. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबाबत तिने सवाल उपस्थित केलेत. मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? असा प्रश्न तिने आपल्या व्हिडिओतून उपस्थित केल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड राग निर्माण झाला आहे.
केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती 'अभिजात दर्जा' या संकल्पनेबद्दल बोलतेय. ती म्हणते, "आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे." तिच्या मते, अभिजात भाषेसाठी हाच मुख्य निकष आहे.
यापुढे ती असे म्हणते की, हा जो काही क्रायटेरिया होता तो २०२४ मध्ये काढण्यात आला. ज्यामुळे मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण वैयक्तिक सांगायचं झालं तर, मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे, तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या."
मराठीत न बोलण्याने भाषेला भोकं पडणार का - अभिनेत्री केतकी चितळे
गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं असून या मुद्द्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिने मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का, असे वादग्रस्त विधान केतकी चितळे हिने केलं आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारिक केलेल्या एका व्हिडीओमध्ये केतकी चितळे म्हणाली की, मराठी न बोलण्यामुळे मराठी भाषेचे नुकसान होत आहे का? त्यांनी जर मराठीमध्ये बोललं नाही तर काय मराठीला भोकं पडणार आहे का?, मराठीमध्ये बोल, मराठी कसे येत नाही, असे म्हणून तुम्ही असुरक्षितता दाखवत आहात. त्यांना काही फरक पडत नाही.या गोष्टीने कुणाच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. पुढे बोलताना केतकी म्हणाली की, बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मिशनरी शाळेत का शिकले तिथे पसायदान होत नाही, ते चालते. मराठीमध्ये बोलणं किती महत्त्वपूर्ण, गरजेचे आहे, असे ज्ञान ते तुम्हाला देत आहे असे म्हणत तिने ठाकरे कुटुंबियांवरही टीकास्त्र डागले आहे.
केतकी चितळे म्हणाली की, 2024 मध्ये मराठी, बंगाली आणि आसामी भाषांना अभिजात दर्जा देण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले होते. या निकषांनाही केतकी चितळेने विरोध दर्शवला आहे. जर असा दर्जा द्यायचा असेल, तर तो सर्व भाषांना दिला जावा, असे तिचे मत आहे. अभिजात दर्जाची इच्छा ही असुरक्षिततेतून येते. हिंदी आणि उर्दू या भाषांनाही अभिजात दर्जा मिळालेला नाही, पण त्यासाठी कोणी लढतही नाही. अभिजात दर्जा मिळाल्याने काहीही बदलत नाही, उलट असुरक्षितता वाढते, असं केतकीचं मत आहे. दरम्यान, केतकी चितळे हिने केलेल्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात परप्रांतियांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामधून मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्यांना मराठीप्रेमींनी मारहाण केल्याचेही प्रकार घडले होते. आता केतकी चितळे हिने केलेल्या या विधानामुळे मराठी विरुद्ध अमराठी हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
तिने केलेला हा विरोध पाहून सोशल मीडियावर मात्र तिच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.