नाशिक: विधिमंडळाचं कामकाज सुरु असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडून गेल्या. विरोधकांनी कृषिमंत्र्यांच्या या कृतीवर चांगलेच तोंडसुख घेतले, इतकेच नव्हे तर हे प्रकरण इतके वाढले कि त्याचे पडसाद लातूर बंद पर्यंत पोहोचले. या सर्व कारणांमुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, या चर्चेला माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत पूर्णविराम लावला आहे. या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांनी आपली बाजू स्पष्ट करताना पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. "मला रमी खेळताच येत नाही" असे सांगत विनाकारण माझी बदनामी सुरु असल्याचे पुढे सांगितले. तसेच जर मी दोषी आढळलोच तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईल असे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद
माणिकराव कोकाटे यांनी आज (२२ जुलै) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याच्या घोषणेऐवजी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा केली. माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी या नव्या योजनेचे लाँचिंग करत असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र, त्याचा जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.
मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही
कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. राजीनामा देणार का या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना माणिकराव कोकाटे म्हणाले, "खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहिती नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहिती नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला.
गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही
मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझं काम होतं. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यांना सभागृहात येता येत नाही. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. ३० सेकंद गेम स्कीप करता येत नाही. माझा व्हिडिओ ११ सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.
त्या क्षणाला न थांबता राजीनामा देईन
पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते. मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे, याप्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
या सर्वांच्या पाठीमागचा सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी चौकशी करावी
माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, तो व्हिडिओ कोणी काढला त्याच्या खोलात मला जायचं नाही. परंतु, त्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की, ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावतील किंवा छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावतील. मी काहीही वेडवाकडं केलेलं नाही. मी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी इतके निर्णय घेतले, त्यासंदर्भात आतापर्यंत कोणीही काहीच बोलंल नाही. फक्त ज्याचा शेतकऱ्यांशी संपर्क नाही, अशा गोष्टी फक्त मीडियात दाखवल्या गेल्या. दोषी असलेल्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे, या सर्वांच्या पाठीमागचा सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी माणिकराव कोकाटे यांनी केले.