अखिल भारतीय छावा संघटनेचे कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी तटकरेंना निवेदन
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आज लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत असताना, अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन गोंधळ घातला. त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहातील कथित रमी खेळण्याच्या व्हिडीओवरुन सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्यासमोर आक्रमक झाले. त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. यादरम्यान त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते भिरकावले. यावेळी सुनील तटकरे यांनी विनम्रपणे छावा संघटनेचं निवेदन स्वीकारलं खरं, पण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच भडकले, आणि नंतर मोठा राडा झाला. ज्यात अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
नेमकं काय झालं?
सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. या दरम्यान अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत तटकरे यांना, कोकाटेंवर कारवाई करण्याचे निवेदन देत असतानाच त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले. "गेम खेळायचा असेल तर घरी खेळा... असं सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. सभागृह हे राज्यातील जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन घेतले. पण पत्रकार परिषदेनंतर मोठा राडा झाला.
सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं. "कृषीमंत्री गंभीर जरुर आहेत. ते गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की तुमच्यासोबत बोलेन. त्यांना कृषीमंत्र्यांची जबाबदारी दिली आहे. शेतकऱ्यांचं हित त्यांनी जपलंच पाहिजे. कुणाच्या मनात संशय असण्याचं कारण नाही. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळेल. एक बाब आहे, आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील आहोत", असं सुनील तटकरे म्हणाले.