धबधबे, तलाव, धरणक्षेत्रात पर्यटकांची वाढली गर्दी
अलिबाग : श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीतील धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात मान्सून कालावधीमध्ये पर्यटकांसह तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस प्रशासनास त्रासदायक ठरत असल्याने धबधब्यांसह धरण, तलाव क्षेत्रात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
या भागांमध्ये पाण्यात बुडून मृत्यूबाबतच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, तसेच कारिवणे येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यूबाबतही श्रीवर्धन पोलीस ठाण्यात १७ जून २०२५ रोजी आकस्मित मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे यावर्षी कोणत्याही प्रकारे धबधबा, धरण व तलाव या क्षेत्रात लोकांची गर्दी होऊ नये, तसेच जिवीतहानी होऊ नये यासाठी या परिसरात २६ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे य उघड्या जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच धबधब्याच्या वरील बाजूस जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे अशी कोणतीही कृती करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.
तसेच महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी. जे. सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ बफर वाजविणे व त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल असे कोणतेही वर्तवणूक करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.