रॉयल्टी न भरल्याने १९० कोटी ३० लाख रुपयांचा दंड
बदलापूर : बदलापूरजवळ असलेल्या चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावांत इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये दगडखाण सुरू होती. या खाणीमुळे भूस्खलन होऊन दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखेर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने या दगडखाणीच्या मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने १९० कोटींचा दंड ठोठावला आहे. राज्यातील दगड खाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
सदर दगड खाणीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे ही दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा बंद होत नव्हती. दरम्यान वनशक्ती या सामाजिक संस्थेने कार्यकर्ते नंदकुमार पवार आणि कोपऱ्याची वाडीतील स्थानिक रहिवासी भास्कर वारघडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात एकत्र लढा दिला. या संदर्भात गावकऱ्यांसोबत वनशक्तीचे कार्यकर्ते नंदकुमार पवार आणि कोपऱ्याची स्थानिक रहिवासी भास्कर वारघडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात एकत्र लढा दिला होता, अखेर या दगडखाण मालकाला परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत १ लाख ३० हजार ब्रास दगड खाणीचे उत्खनन केल्याने आणि त्याची रॉयल्टी न भरल्याने १९० कोटी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीने अंमलबजावणी करावी असे आदेश सुद्धा उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे आता ही दगडखाण बंद होणार असल्याने गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. ही दगडखाण बंद होणार असल्याने आमच्या आरोग्यावर होत असलेली हानी थांबणार असल्याचे भास्कर वारघडा यांनी सांगितले. तसेच गावकऱ्यांनी या निर्णयासंदर्भात समाधान मानले आहे.
ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जमीनही नापीक झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे झरेही बंद झाले होते. त्यामुळे या विरोधात वनशक्तीच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या दंडावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत सक्तीने वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना होणारा त्रास बंद होणार असून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी याबाबत तातडीने कारवाई करावी.
- नंदकुमार पवार, याचिकाकर्ते आणि वनशक्तीचे सदस्य