निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण
२८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर होणार निर्णय
नवी दिल्ली : बिहारप्रमाणेच पुढील महिन्यापासून संपूर्ण देशभरात मतदार यादी सुधारणा मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये मतदारांची सखोल पडताळणी केली जाईल. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली यंत्रणा सक्रिय केली आहे.
परदेशी बेकायदेशीर स्थलांतरितांना मतदार यादीतून काढून टाकण्यासाठी ही मोहीम देशभरात राबवली जाईल. या वर्षी बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. तर आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका २०२६ मध्ये होणार आहेत. त्यापूर्वी या राज्यांतील मतदार यादी सुधारणा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आयोगाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै रोजी बिहारमध्ये विशेष सुधारणा मोहिम सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यानंतर आयोगाकडून हा निर्णय आला. न्यायालयाने ते घटनात्मक घोषित केले होते.
तथापि, अनेक विरोधी पक्षांकडून या सुधारणांना विरोध सुरू झाला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिले आहे. या मोहिमेमुळे पात्र नागरिक त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील, असा दावा याचिकाकर्त्यांचा आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बिहारमधील विशेष माेहिम प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार असल्याने निवडणूक अधिकारी २८ जुलैनंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
२००८ ची मतदार यादी दिल्लीच्या सीईओंच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, जेव्हा शेवटची मतदार यादीची विशेष पडताळणी दिल्लीत करण्यात आली होती. उत्तराखंडमध्ये शेवटची मतदार यादीची विशेष पडताळणी २००६ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळची मतदार यादी राज्याच्या सीईओंच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. राज्यांमधील शेवटची मतदार यादीची विशेष पडताळणी ही कट-ऑफ तारीख म्हणून काम करेल. कारण निवडणूक आयोग बिहारची २००३ ची शेवटची मतदार यादी विशेष पडताळणीसाठी वापरत आहे.
बिहारच्या मतदार यादीत नेपाळ, बांगलादेशातील लोक
बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीचे काम सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, बिहारमध्ये मोठ्या संख्येने परदेशी नागरिक आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, 'आम्ही मतदार यादी सुधारणेसाठी घरोघरी भेटी दिल्या. या दरम्यान, आम्हाला नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमधील मोठ्या संख्येने लोक आढळले.'
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'अशा लोकांची १ ऑगस्टनंतर चौकशी केली जाईल. ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत बेकायदेशीर स्थलांतरितांची नावे समाविष्ट केली जाणार नाहीत.' मतदार यादी पडताळणीचे काम २४ जून रोजी सुरू झाले आणि मतमोजणी फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२५ आहे. मतदार मतमोजणी फॉर्म सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.