लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताला विजयासाठी १९३ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला. वॉशिंग्टन सुंदरला या सामन्यात ४ विकेट मिळाल्या. तर बुमराह आणि सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. दरम्यान, भारताची सुरूवात खराब राहिली. सलामीवीर यशस्वी जायसवाल खाते न खोलताच बाद झाला.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही ३८७ धावांवरट आटोपला. म्हणजेच पहिल्या डावात दोन्ही संघ बरोबरीत होते. आता लॉर्ड्स कसोटीत भारताला विजयासाठी १९३ धावा करायच्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा केवळ एक षटक खेळता आले. या षटकांत भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा सलामी फलंदाज जॅक क्राऊली यांच्यात वादावादी झाली.
भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलचे शतक
भारतीय संघाच्या पहिल्या डावात सलामीवीर केएल राहुलने शतक ठोकले. राहुलने १७७ बॉलमध्ये १०० धावा केल्या. यात १३ चौकारांचा समावेश आहे. राहुलचे कसोटी करिअरमधील हे दहावे शतक आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ७४ धावा आणि रवींद्र जडेजाने ७२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.