ठाकूरवाडीच्या विद्यार्थ्यांची उपरोधिक मागणी: "चंद्रावर जाऊ, पण शाळेपर्यंत रस्ता द्या!"

पालघर: एकीकडे पालघर जिल्ह्यात हजारो कोटींचे प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि भव्य रस्ते आकाराला येत असताना, दुसरीकडे मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमधील ठाकूरवाडी येथील विद्यार्थ्यांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे. निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने, चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज चिखल आणि पाण्याने भरलेल्या वाटेतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या विदारक परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकारला उपरोधिक मागणी केली आहे: "आम्ही शाळा शिकून चंद्रावर, मंगळावरही जाऊ, पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या!"


ठाकूरवाडीतील जवळपास १५ ते २० विद्यार्थी दररोज निरगुडवाडी येथील शाळेत पायी जातात. हे अंतर १ ते दीड किलोमीटरच्या आसपास असल्याने येथे बससेवेचा प्रश्नच येत नाही, कारण जिथे चालण्यासाठीही धड रस्ता नाही, तिथे बस जाणे अशक्य आहे. त्यामुळे पाठीवर दप्तर घेऊन हे विद्यार्थी दररोज ये-जा करतात.


मात्र, पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि चिखल होतो. या चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. अनेकदा रस्त्यावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना भिंतीवरून उड्या मारून जावे लागते. नुकतीच एका विद्यार्थ्याचा उडी मारताना पडल्याची घटनाही ग्रामस्थांनी सांगितली.


या बिकट परिस्थितीमुळे पालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना आपली कामे सोडून त्यांच्यासोबत जावे लागते. "रस्ता चांगला केला तर एखादी गाडी किंवा मुले चालतही कोणत्याही अडचणीशिवाय जाऊ शकतील," असे एका ग्रामस्थाने सांगितले.


जर हीच परिस्थिती राहिली, तर पावसाळ्यात मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा इशाराही संतप्त पालकांनी दिला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असे ते म्हणाले. अन्यथा, बांधकाम विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवू, असेही त्यांनी उपरोधिकपणे सुनावले आहे.


जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांची ही व्यथा प्रशासनासाठी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल