भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड
कल्याण: कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या उपनगरांमधील वीजपुरवठा गेली तासभर अचानक खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात कुठलीही पूर्वसूचना देखील न आल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या संदर्भात महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाली आहार. या सबस्टेशनमधील काही महत्त्वाच्या मशीनमध्ये अचानक स्पार्क झाल्याची घटना घडली असल्यामुळे विजेचा पुरवठा तात्काळ थांबवण्यात आला.
सध्या तांत्रिक कर्मचारी आणि अभियंते घटनास्थळी काम करत आहेत. मात्र, वीज नेमकी केव्हा येणार याबाबत अद्याप निश्चित वेळ सांगता आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अजून काही काळ अंधाराचा सामना करावा लागणार आहे. या अचानक झालेल्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे घरगुती कामे, व्यवसायिक उपक्रमांचे कामकाज ठप्प झाले आहे. नागरिकांनी महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.