ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे घाटमाथा परिसरात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे घाटमाथालगत भागात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील इतर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे, नाशिक, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा नाशिक घाटमाथा भाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यानध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या काळात कोकणात ४५-५५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील.
पालघर जिल्ह्यात आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
जिल्ह्यात ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी या संबंधित आदेश जारी केले आहेत. असे असले तरी मुख्याद्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे लागणार आहे. पालघर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. सोमवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.






