पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास
सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती यामध्ये बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. आत्ता असलेला जो शक्तिपीठ महामार्गाचा प्लॅन आहे तो आपल्यासाठी उपयोगाचा नाही, हा प्लॅन आम्ही बदलणारच आहोत. शक्तिपीठ मार्ग लोकांच्या हितासाठी आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाचे टोक गोव्यात निघत असेल तर महाराष्ट्र, सिंधुदुर्गला काय फायदा? त्यामुळेच हा महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथून निघेल असा प्लॅन तयार केला जाणार आहे,असे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शक्तिपीठ महामार्गासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,शक्तिपीठ संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची आणि माझी चर्चा झाली आहे. तसेच कालच मी एमएसआरटीसी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत, त्यांच्याशी ही चर्चा केली आहे. सर्वात प्रथम सिंधुदुर्गच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांना मी स्पष्ट भूमिका राज्य सरकारची सांगेन की, प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग होणार आहे. आम्ही,मी असो किंवा खासदार नारायण राणे साहेब आणि जिल्हाधिकारी असे जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये दोन आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एमएसआरडीसी आणि अन्य अधिकाऱ्यांना सांगितले की, लोकांना विश्वासात घेतल्यानंतरच हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी दोन-तीन मार्ग दाखवा कारण, आता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे, त्याच्यामध्ये आमचं बांदा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आणि म्हणून आम्ही सांगितलं की या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत.
हा महामार्ग जर गोव्यात निघत असेल तर त्याचा महाराष्ट्राला काय फायदा, सिंधुदुर्गाला काय फायदा म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो एकशे एक टक्के आम्ही बदलणारच आहोत. त्यासंबंधी कॅबिनेट मध्ये पण आमची चर्चा झाली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर दोन जे काही पर्याय आम्ही सुचवलेले आहेत ते त्याच्यामुळे जो आता जो पर्याय नवीन येतो तो झिरो पॉईंट किंवा मळगाव या काही भागांमध्ये तो शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो, रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल. जनतेचे नुकसान होणार नाही किंवा तिकडे किंवा कोणाला हलविण्याची गरज वाटणार नाही. काही लोकांच्या जे काही शेती मधून अगर जमीन जात असेल तर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनाही योग्य पद्धतीने मोबदला दिला जाईल. पण आत्ता जो करंट प्लान आहे तो एकशे एक टक्के आम्ही बदलणार आहोत. तो आताचा प्लॅन राहणार नाही माजी मंत्री आमदार केसरकर यांनीही कालच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. आमची जी काही भूमिका आहे ती आमच्या सगळ्यांची एकत्र भूमिका आहे. आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. लोकांनी आठ नऊ महिने अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेले आहे आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे.
लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे. ज्यांना लोकांनी नाकारलेले आहे. ज्यांना लोकांनी घरी बसवलेले आहे. त्यांनी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करू नये. तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी संवाद करायला पालकमंत्री म्हणून मी तयार आहे. आम्हाला काय उगाच वातावरण खराब करायचं नाही. उगाच कुठलाही पोलीस बळाचा वापर करायचा नाही.
जे आंदोलन करत आहेत जे काही त्यांची शिष्टमंडळ आहेत. जी समिती केली असेल तर समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलावे, त्यांच्या काही प्रश्नांची उत्तर द्यायचं असेल तर मी तयार आहे आणि आमची भूमिका पारदर्शक आहे. आम्हाला काही लपवालपवी करायची नाही. हा नॅशनल हायवे तयार केला आहे. तसेच हा शक्तिपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठी केला जाईल आणि म्हणून तो मार्ग गोव्याकडे न जाता आता मळगाव किंवा झिरो पॉईंट झाराप असा आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल म्हणून याबाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची गरज नाही कोणालाही संवाद करायचा असेल तर मी कधीही त्याच्यासाठी तयार आहे,असे स्पष्ट मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.