आज पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी प्रसारमाध्यमांसमोर रोहित पवार वारकरी वेशात आले, सोबत संविधानाची प्रत त्यांनी घेतली होती, यादरम्यान त्यांनी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले "गेल्या काही दिवसांपासून काही आमदार राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी तसेच एका वेगळ्या पद्धतीचे वातावरण या महाराष्ट्रात निर्माण व्हावं याचा प्रयत्न करू पाहत आहेत. ज्यामुळे संविधानाच्या विरोधात असलेला जनसुरक्षा कायदा राज्यात लागू करणे सोपे जाईल, असे त्यांना वाटत आहे. मात्र यासाठी ते वारकऱ्यांना आणि पवित्र वारीला बदनाम करू पाहत आहे." रोहित पवार यांनी असे विधान करताना आमदार मनीषा कायंदे यांचे नाव घेणे जाणीवपूर्वक टाळले.
काय म्हणाले रोहित पवार पहा व्हिडिओ:
शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी सांगितले की पंढरपूरच्या वारीत देवाला न मानणारे आणि अर्बन नक्षली घटकांनी शिरकाव केला आहे. या घटकांमुळे वारीच्या पवित्रतेला धक्का पोहोचण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
डॉ. कायंदे यांनी विधान परिषदेत भाषण करताना सांगितले की वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिकतेचा आधार आहे. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा निर्मळ आणि पवित्र राहिली पाहिजे. परंतु काही घटक या पवित्र परंपरेचा गैरवापर करून आपला राजकीय अजेंडा पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत.