तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर
नवी दिल्ली: दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीत चीनने अडथळे निर्माण करण्याचा पवित्रा घेतला आहे. तिबेटी बौद्ध धार्मिक नेते, १४ वे दलाई लामा यांनी जेव्हापासून पुढील दलाई लामाची घोषणा त्यांच्या हयातीतही होऊ शकते अशी घोषणा केली तेव्हापासून चीन अस्वस्थ झाला आहे. दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीसाठी चीनची मान्यता घ्यावी लागेल, असा चीन आग्रह धरत आहे. ज्यावर आता भारत सरकारनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Dispute over Dalai Lama's succession)
भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे की, उत्तराधिकारी निवडीचा निर्णय केवळ दलाई लामा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेनुसारच घेतला जाईल. कोणत्याही तृतीय पक्षाला, मग तो देश असो वा संस्था, या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
दलाई लामाच्या उत्तराधिकारावरून वाद
६ जुलै रोजी तिबेटी बौद्ध धार्मिक नेते दलाई लामा ९० वर्षांचे होतील, त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारावरून सुरू असलेला वाद हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये चीन हस्तक्षेप करू लागला आहे. दलाई लामा यांच्या भावी उत्तराधिकारी घोषणेसाठी चीनची मान्यता असायला हवी, असे म्हणत चीन नाक खुपसू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नावर टीका केली आहे.
दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार कोणत्याही देशाला नाही
किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे की "दलाई लामा यांचे पद सर्वात महत्वाचे आहे. हे पद केवळ तिबेटी लोकांसाठीच नाही तर सर्व बौद्ध उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. दलाई लामांव्यतिरिक्त इतर कोणालाही दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार नाही. दलाई लामांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यातही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय घेण्याचा एकमेव अधिकृत हक्क त्यांच्या 'गाडेन फोडरंग ट्रस्ट'कडेच आहे. चीनने मांडलेल्या उत्तराधिकारी मान्यतेच्या दाव्याला पूर्णपणे फेटाळत त्यांनी ही भूमिका मांडली. चीनकडून करण्यात आलेल्या दाव्याचे खंडन करताना भारताने पुन्हा एकदा तिबेटी बौद्ध परंपरेचा आदर करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे. "कोणताही देश अगदी चीनसुद्धा दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे ठरवू शकत नाही," असे ठाम मत रिजिजू यांनी व्यक्त केले. देशभरातील बौद्ध अनुयायी दलाई लामांच्या शिकवणी आणि धार्मिक परंपरांचे आजही निष्ठेने पालन करतात, असेही रिजिजू यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा केला जाणार दलाई लामांचा वाढदिवस
दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस येत्या ६ जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा होणार असून, भारत सरकारकडून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंग या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही भूमिका भारताने तिबेटी बौद्ध धर्मगुरूंच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावर घेतलेली स्पष्ट केली आहे.