कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे बेकायदा झोपड्या व पक्क्या इमारतींचे पेव फुटले आहे. १० वर्षांपासून खाडीकिनारी खारफुटींवर रॅबिट वा मातीचे ढिगारे टाकून तिथे झोपड्या उभारल्या जात आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेकायदा बांधकामांकडे तहसीलदार, वनखाते आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नदीचे नाले आणि नाले अधिकाधिक रुंद होत चालले आहे. नदी पुनर्जिवीत कशी होणार? असा जटील प्रश्न, सतर्क नागरिकांना, पर्यावरण प्रेमीना भेडसावत आहे.
चारकोप आणि गोराईतील जवळपास ४० हेक्टर परिसर खारफुटीच्या वनांनी व्यापला आहे. वनविभागाने संपूर्ण जागा संरक्षित वनविभाग असल्याचे फलकही लावले आहेत.
गोराई ते दहिसरपर्यंत जवळपास ८० हेक्टर परिसरात खारफुटी आहे. चारकोप गाव, गोराई खाडी, एमएचबी कॉलनी परिसर, एक्सर, धर्मानगर आणि गणपत पाटीलनगर परिसरातील खारफुटीवर व दलदलीच्या भागात रात्री डेब्रिज टाकले जाते. त्याखाली खारफुटी गाडल्या जातात. काही दिवसांनंतर स्थानिक गुंड आणि काही स्वयंघोषित कार्यकर्ते भंगारवाले, रद्दीवाले व तबेलेवाल्यांना तिथे आणून ठेवतात. सुरुवातीला प्लास्टिकचे झोपडे उभारून आणि नंतर पत्र्याचे वा पक्के बांधकाम करून ते विकले जातात. चारकोप-गोराई जोडणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी मांडली भूनिका चारकोप गोराई, बोरिवली-दहिसरमधील गणपत पाटीलनगरात खारफुटीची कत्तल करून मोठी झोपडपट्टी वसलेली आहे. राजकारण्यांची हक्काची मतपेटी असल्याने राजकीय पक्षांच्या स्वयंघोषित नेत्यांचे अतिक्रमणाला वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. खाडीपुलाच्या बाजूलाही अशाच प्रकारचे बेकायदा व्यवसाय उभे राहिले आहेत.
बेकायदा बांधकामावर महापालिका, तहसीलदार, पोलीस खाते आणि वनखात्याकडून कारवाई होत नाही. तक्रारदारांची नावे स्थानिक गुंडांपर्यंत पोहोचत असल्याने तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नाही, यामुळे मिठी नदी, दहिसर नदी असो वा पॉईसर नदी.. यां नद्यांचे नाले झाले आहेत. याचं नदी नाल्यांना तट भिंती नसल्याने, त्या नद्या अनधिकृत बांधकामत अरुंद होत आहेत. नदीला पुनर्जीवीत करण्यासाठी अनेक वर्ष रिव्हर मार्च (रॅली) निघाली; परंतु अजून ही याकडे सरकारचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पुरेपूर लक्ष नाही. लक्ष असते तर हे असे नदी-नाल्यांमध्ये, मॅग्रासच्या जागेवर अतिक्रमण अनधिकृत बांधकाम झाले नसते. संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि संरक्षण भिंत बांधवी तरच नदी वाचेल आणि नदी पुनर्जिवीत करता येईल, अशी कैफियत मांडण्यात आली आहे.