इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य
नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला संघांतील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आज, शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत चमकदार कामगिरी करण्यासह पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी, इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचेही लक्ष्य असणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ मैदानात उतरणार आहे. येथे दोघेही तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकमेकांसमोर येतील.
स्फोटक सलामीवीर
सलामी फलंदाज शफाली वर्माचे पुनरागमन झाले असून क्रांती गौड, श्री चरनी आणि सायली सातघरे यांसारख्या युवा खेळाडूंनाही या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. उमा छेत्रीला सलामीला खेळताना फारसे प्रभावित करता आलेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात शफाली आणि स्मृती मनधाना डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वपूर्ण
विश्वचषकासाठी वर्षभराचा कालावधी शिल्लक असला, तरी गेल्या वर्षी साखळी फेरीतच गारद झालेल्या भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वपूर्ण आहे.
भारताचा हा वर्षातील पहिला ट्वेन्टी-२० सामना आहे. अष्टपैलू स्नेह राणा आणि अमनजोत कौर यांच्या पुनरागमनाकडेही सर्वांचे लक्ष असेल. राणा फेब्रुवारी २०२३ नंतर प्रथमच ट्वेन्टी-२० संघात परतली आहे. महिला प्रीमियर लीगमधील चांगल्या कामगिरीमुळे तिचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान भारताचे वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर आणि पूजा वस्त्रकार दुखापतीमुळे या दौऱ्यात खेळू शकणार नाहीत. त्यामुळे अन्य गोलंदाजांची कसोटी लागेल.