शीव उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण

मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस व रेल्वे विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक


मुंबई : मुंबईतील शीव (सायन) व बेलासिस उड्डाणपुलांच्या कामांना वेग मिळत असून, ही कामे गतीने आणि नियोजनबद्ध रितीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. रेल्वे प्रशासनासह समन्वय साधत कामांचे सुयोग्य नियोजन करावे. सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण होतील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. १५ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस आणि ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, अशी ठोस कालमर्यादाही बांगर यांनी निश्चित केली आहे.


शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या दोन्ही प्रकल्प कार्यस्थळास सोमवारी २३ जून २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला. तसेच, २४ जून २०२५ मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेत विविध निर्देश दिले.


पोलीससह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे यांच्यासह मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला, सहायक अभियंता (निर्माण) व्ही. व्ही सतिशन यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते.


शीव पुलाचे बांधकाम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
अभिजीत बांगर म्हणाले की, शीव पुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे काम रेल्वे विभागामार्फत सुरू असून ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर म्हणजे, ३१ ऑगस्ट २०२५ नंतर मुख्य पुलाच्या दक्षिणेकडील भागाच्या तोडकामास सुरूवात केली जाईल. त्याचवेळी पुलाखालील जुन्या पुलाच्या भिंतीचे तोडकामही सुरू केले जाईल. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील एका बाजुचा भुयारी मार्ग पूर्णत्वास आला आहे. त्या पोहोच मार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल. १ ऑक्टोबर २०२५ पासून दुस-या भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल. धारावी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाकडे जाणा-या पोहोच रस्त्यांची कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. उर्वरित पोहोच मार्गाचे काम १५ दिवसात पूर्ण करून शीव उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असेही बांगर यांनी नमूद केले.
बोलासिस पुलाचे बांधकाम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार


अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर पुढे म्हणाले की, बेलासिस पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पूल बांधकामास अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटविण्यासाठी पर्यायी घरांचे वाटप करण्यात आले आहे. बांधकामे हटविण्यासंदर्भातील कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत सुरू आहे. पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत बाधित होत असून तीस मोकळी जागा रस्त्यासाठी आवश्यक आहे. ती जागा उपलब्ध उपलब्ध करून देण्याची कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे. दोन्ही पोहोच मार्गांची कामे हाती घेऊन एकंदरीत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे नियोजन आहे, असे अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला