लीड्स येथे सुरू असलेल्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या तर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ४६५ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर बिनबाद २१ धावा केल्या आहेत. त्यांना जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी आणखी ३५० धावांची आवश्यकता आहे.
पहिल्या डावात भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतकी खेळी केली. इतर फलंदाज त्यांना मोलाची साथ देण्यात अपयशी ठरले. यामुळे तीन फलंदाजांनी शतके करुनही भारताला ५०० धावांचा टप्पा ओलांडणे जमले नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघातील ओली पोपने १०६ धावा केल्या. हॅरी ब्रूकने ९९ आणि बेन डकेटने ६२ धावा केल्या. इतर खेळाडूंनी संघाची धावसंख्या वाढवण्यात योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच तर प्रसिद्ध कृष्णाने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या.
दुसऱ्या डावात भारताकडून केएल राहुलने १३७ आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ११८ धावा केल्या. इंग्लडकडून जोश टंग आणि ब्रायडन कार्सेने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शोएब बशीरने दोन तर ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडची दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरू आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २१ धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली १२ आणि बेन डकेट ९ धावांवर खेळत आहे. लीड्स कसोटी जिंकणारा संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयाने शुभारंभ करत आघाडी घेणार आहे. दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळत आहेत ते बघता सामना अनिर्णित राहण्याची शक्यता कमी आहे.