मुंबई: पृथ्वी शॉ आता स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघाला बाय-बाय म्हणू इच्छित आहे. यासाठी पृथ्वीने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ला ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे. (Prithwi Shaw Will Leave Mumbai Cricket)
स्टार फलंदाज पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. पृथ्वी शॉ ने २५ जुलै २०२१ रोजी भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला. २५ वर्षीय पृथ्वीचा फॉर्म देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगला नव्हता. तसेच, त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वी शॉ स्वत: हूनच स्थानिक क्रिकेटमधील मुंबई संघातून बाहेर पडू इच्छित आहे. यासाठी पृथ्वीने मुंबई क्रिकेट असोसिएशनला आगामी स्थानिक हंगामापूर्वी यासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याची विनंती केली आहे. पृथ्वीला दुसऱ्या राज्य संघटनेकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. आणि त्यामुळेच त्याला मुंबई संघ सोडायचा आहे.
पृथ्वीने एमसीएला लिहिले पत्र
पृथ्वी शॉ ने एमसीएला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, मला दुसऱ्या राज्य संघटनेच्या वतीने व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची चांगली संधी मिळाली आहे. मला विश्वास आहे की यामुळे मी क्रिकेटपटू म्हणून अधिक विकास आणि प्रगती करू शकेन. हे लक्षात घेता, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की मला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यावे, जेणेकरून मी येत्या स्थानिक हंगामात नवीन राज्य संघटनेचे अधिकृतपणे प्रतिनिधित्व करू शकेन.'
एमसीएने पृथ्वी शॉ ला अनेक सामन्यांतून वगळले होते
मागच्या वर्षी खराब फिटनेसमुळे पृथ्वी शॉला रणजी ट्रॉफी सामन्यासाठी मुंबई संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले की पृथ्वी शॉचे वजन जास्त आहे आणि त्याच्या शरीरात 35 टक्के चरबी आहे. त्यानंतर त्याला फिटनेस परत मिळवण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र पृथ्वीचा फिटनेस काही सुधारला नाही, ज्यामुळे मुंबई संघाच्या निवडकर्त्यांनी त्याला विजय हजारे ट्रॉफी 2024 मधूनही बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला.
पृथ्वीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
पृथ्वी शॉने भारतासाठी ५ कसोटी, ६ एकदिवसीय आणि १ टी-२० सामना खेळला आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४२.३७ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, पृथ्वीच्या नावावर ३१.५० च्या सरासरीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात १८९ धावा आहेत. पृथ्वीला त्याच्या एकमेव टी-२० सामन्यात खाते उघडता आले नाही. पृथ्वीने २०२२ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतात त्याचा शेवटचा लिस्ट-ए सामना खेळला. त्याने गेल्या देशांतर्गत हंगामात इंग्लिश काउंटी संघ नॉर्थम्प्टनशायरसाठी एकदिवसीय कप सामने खेळले, जिथे त्याने पाच डावांमध्ये ९७, ७२, ९, २३ आणि १७ धावा केल्या.