रायगड : कोकणात दरड प्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब समोर आली असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरड प्रवण गावांची यादी प्रसिध्द केली आहे. रायगड मधील ३९२, रत्नागिरी मधील १८१ तर सिंधुदुर्ग मधील ६३ गावांचा यात समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरडप्रवण गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात या गावांना सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षीपर्यंत १८३ दरडप्रवण गावे होती. मात्र इरशाळवाडी दरड दुर्घटनेतील ८४ जणांच्या मृत्यूनंतर डोंगर माथ्यांवरील दरडप्रवण गावांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर दरड प्रवण गावांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण गावांची संख्या १८३ वरून ३९२ वर गेली आहे. यात पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश आहे. ज्यातील ७१ गावे ही अतिधोकादायक दरडप्रवण गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यात यापुर्वी दरड दुर्घटनांच्या ११ मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यात जुई, दासगाव, रोहण, कोंडीवते. कोतवाल, केवनाळे, साखर सुतारवाडी, तळीये आणि इरशाळवाडी येथील घटनांचा समावेश आहे. २००५, २०२१,२०२३ मध्ये मोठ्या दरड दुर्घटना घडल्या जात मोठी जिवित हानी आणि वित्त हानी झाली. या घटनांची गंभीर दखल घेऊन भूवैज्ञानिकांकडून संभाव्य दरड प्रवण गावांचे फेर सर्वेक्षण करण्यात आले ज्यात कोकणातील तीनही जिल्ह्यात दरडप्रवण गावांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
दरड प्रवण गावात उपाय योजना
दरड प्रवण गावांचे पाच श्रेणीमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यातील अतिधोकादायक गावात ‘पीए सिस्टम’ म्हणजे सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसविण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी २१ ठिकाणी हवामान विषयक पूर्व सूचना देण्यात येतील. लाईव्ह अथवा रेकॉर्डेड संदेश देता येईल. या ठिकाणी सायरन वाजविला जाणार आहे. – सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड.