पुणे : कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवर असलेला पादचारी साकव कोसळून भीषण दुर्घटना घडली. ३५ वर्षे जुना असलेला हा पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. पुलाची मुदत संपल्यानं तो दळणवळणासाठी धोकादायक बनला होता. या पुलाचा वाहतूकीसाठी वापर करू नये अशा सूचना सातत्याने दिल्या जातात. पण शॉर्टकट असल्यानं या पुलाचा वापर केला जात होता.
साकव ३५ वर्षे जुना झाल्यानं नव्या पुलाचा प्रस्ताव देण्यात आला होता. ग्रामस्थांकडून नव्या पुलाच्या उभारणीची मागणी होत होती. डिसेंबर २०२२ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नव्या पुलाचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना केली होती. त्यानंतर ११ जुलै २०२४ रोजी साडे आठ कोटी रुपये खर्चाच्या जोड रस्त्यासह मोठ्या पुलाला मंजुरी मिळाली होती. इतकंच नव्हे तर नव्या पुलाच्या कामाचा निधी आल्यानंतर त्याचं काम सुरू करण्यासाठी आदेशही निघाला होता. आदेश निघाल्यानंतर पाचच दिवसात हा पूल कोसळून ही दुर्घटना घडलीय. नव्या पुलाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी ८ कोटी निधी दिला जाणार आहे. साकव पुलाजवळच नवा पूल उभारण्याचं नियोजन होतं. हा प्रस्तावित पूल १७० मीटर लांब आणि ७.५ मीटर रुंदीचा असणार आहे. या पुलाचा कार्यरंभ आदेश काढण्यात आल्याच्या पाच दिवसातच जुना पूल कोसळला आहे. जुन्या पुलासाठी २० लाखांचा खर्च करण्यात आला होता.