वाहन चालकांसह प्रवाशांना डोकेदुखी
कांदिवली : कांदिवली विभागात मुख्य मार्गांवर, रस्त्यावर, नाक्यावर तसेच सुशोभीकरण केलेल्या सिग्नल चौकात पडलेल्या बॅरिकेट्समुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. अस्तव्यस्त पडलेल्या बेरिकेट्सकडे ठेकेदार, पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. अपघात झाल्यानंतर जाग येणार का? असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे.
कांदिवलीत रस्त्याच्या कामाला पूर्ण विराम मिळाला आहे. अंतिम तारीख उलटल्याने ठेकेदारांनी तकलादू पद्धतीने रस्त्याची कामे पूर्ण केली. कांदिवली गावठाण मार्गांवर सुरक्षिततेसाठी कामात वापरलेले बेरिकेट्स कर्मचाऱ्यांनी जागेवर टाकले आहेत. सदर मुख्य मार्ग अरुंद असल्याने, मार्गांवर काळोख असतो, अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद या मुख्य मार्गांवर, प्रचंड वाहतूक असते. या मार्गांवर बेरिकेट्सचे पाय तुटल्याने कित्येक दिवस रस्त्यावर तसाच आहे. मुंबई पोलीस नाका बंदीला याच बेरिकेट्सचा वापर करतात.
सिग्नल चौकात किलाचंद मार्गाकडे जाणाऱ्या पद पथाच्या लोखंडी ग्रील्सवर तुटलेले बेरिकेट्स मार्ग फलकासमोर अडकविण्यात आले आहे. यामुळे पदपथावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना धोकादायक ठरत आहेत. जीवनदास मटानी चौकात सिग्नल जवळ तुटलेले बेरिकेट्स कित्येक दिवसांपासून पडून आहे. सिग्नल लागताच थांबणाऱ्या वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहेत. मुख्य मार्गांवरील बेरिकेट्ससाठी योग्य उपाययोजना करून आम्हाला दिलासा द्यावा, अपघात मुक्त मार्ग निर्माण करावा अशी मागणी वाहन चालकांसह प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.