राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत विकासाला प्राधान्य

मुंबई : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आयडॅक मुंबई आणि गृहनिर्माण विभाग आयोजित ‘आयडिया एक्स्पो २०२६’ या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.


“देशभरातून मुंबईत आलेल्या सर्वांचे मी महाराष्ट्राच्या भूमीवर मनापासून स्वागत करतो. आयडिया एक्स्पो हे केवळ प्रदर्शन नसून नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि विकासाचा रोडमॅप ठरवणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. हा सातवा आयडिया एक्स्पो असून तीन दिवसांच्या प्रदर्शनात २० हजार लोक सहभागी होतील. आर्किटेक्ट, बिल्डर्स, शहरी नियोजक, उद्योग क्षेत्रातील नेते, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ एकत्र येऊन शाश्वत विकासावर चर्चा करतील. अलीकडेच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हे केवळ बजेट नसून २०४७ पर्यंतच्या ‘बिल्डिंग महाराष्ट्र, बिल्डिंग इंडिया’ या दृष्टीकोनाची झलक आहे. महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन आहे”; असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


“राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या आग्रहामुळे मी बजेट अधिवेशनातील काम बाजूला ठेवून येथे उपस्थित राहिलो. मुंबई ही वर्ल्ड क्लास सिटी आहे. त्यामुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी आणि प्रदर्शनांसाठी मुंबईला प्राधान्य दिले जाते. अलीकडेच येथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट झाला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. बीकेसीमधील दोन भूखंड जगातील मोठ्या जपानी गुंतवणूकदारांनी घेतले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि गुंतवणूक राज्यात येणार आहे”; असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण, डेटा सेंटर पॉलिसी, लॉजिस्टिक पॉलिसी, सेमीकंडक्टर आणि हायटेक मॅन्युफॅक्चरिंगसाठी विशेष धोरण लागू केल्याची माहिती त्यांनी दिली.



“जानेवारीमध्ये दावोस येथे सुमारे तीस लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून लाखो रोजगार निर्माण होतील. २०२५ मध्ये राज्यात ५३ महत्त्वपूर्ण एमओयू झाले असून सुमारे २.९६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. औद्योगिक विकास आता केवळ मुंबई-पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. मुंबई-पुणे-नाशिक-छत्रपती संभाजीनगर औद्योगिक कॉरिडॉर, नागपूर-वर्धा लॉजिस्टिक हब आणि कोकणातील पोर्ट बेस इंडस्ट्री विकसित होत आहेत. पूर्वी मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीमध्ये आता स्टील हब तयार होत आहे. तेथे औद्योगिक क्रांती घडत आहे. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोड आणि अटल सेतू सारखे गेमचेंजर प्रकल्प उभे राहिले आहेत. पूर्वी नागपूर-मुंबई प्रवासाला १६ तास लागायचे. समृद्धी महामार्गामुळे आता सात तासांत प्रवास शक्य झाला आहे. एमएमआरमध्ये सुमारे ३५० किमी मेट्रो नेटवर्क तयार होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होईल.” त्यांनी स्पष्ट केले की, पालघर जिल्ह्यात देशातील सर्वात मोठे बंदर उभारले जात आहे. त्यासाठी सुमारे ७६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. एमएमआरमध्ये सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित आहेत. नवी मुंबई विमानतळ आणि वाधवान पोर्टमुळे ‘तिसरी मुंबई’ विकसित होत आहे. येथे मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि आधुनिक शहरी सुविधा उभारल्या जातील. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणजे रिअल इस्टेट आहे. कोविड काळात या क्षेत्राला मोठा फटका बसला होता. त्यामुळे सरकारने युनिफाईड डीसीपीआर लागू केला, एफएसआय वाढवला आणि प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. मुंबई स्लम फ्री करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प सुरू केले आहेत. कामराजनगर आणि ठाणे येथे प्रकल्प सुरू आहेत. धारावी पुनर्विकास हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येकाला स्वतःचे घर असावे हे स्वप्न होते. त्या दिशेने सरकार काम करत असून लाखो घरे निर्माण करण्याचा संकल्प आहे. आमचे सरकार ‘प्रो डेव्हलपमेंट आणि प्रो एन्व्हायर्नमेंट’ या तत्त्वावर काम करत आहे”; असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अटल सेतू बांधताना फ्लेमिंगो पक्ष्यांवर परिणाम होणार नाही यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


“देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे योगदान सुमारे १४ टक्के आहे. देशातील ३० टक्के एफडीआय महाराष्ट्रात येतो.”  “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील ३५ देशांपेक्षा मोठी आहे.” असेही त्यांनी स्पष्ट केले. “मेक इन इंडिया सोबत आता ‘मेक फॉर वर्ल्ड’चा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार वेगाने निर्णय घेणारे सरकार आहे. “आयडिया एक्स्पो २०२६ नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांसाठी मोठे व्यासपीठ ठरेल.” असे शिंदे म्हणाले. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, ज्येष्ठ वास्तूविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर, मुंबई फर्स्ट संस्थेचे अध्यक्ष सतीश कुमार सिन्हा, महिंद्रा लाइफस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कॉन्ट्रॅक्टर, नाईट फ्रँकचे वरिष्ठ कार्यकारी निर्देशक देबेन मोझा आणि संस्थेचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.