मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. मात्र, आता (दि.१३) जूनपासून पुन्हा एकदा राज्यात मान्सूनचे जोरदार कमबॅक होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून, राज्यातील एकूण १३ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे असून, मुसळधार पाऊस बरसण्याचे भाकीत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे राज्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.तसेच शेतीपिकांनाही मोठा फटका बसला होता.
त्यानंतर आता जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे. साधारणपणे राज्यात १५ जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. मात्र, यावेळी मान्सून लवकर दाखल झाला होता. त्यामुळे पाऊस लवकर सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.