संवाद एकाकी फुलाशी

सहजच : शुभांगी मांडे खारकर


त्या फुलाला कुणीतरी विचारलं, एकटा एकटा राहतोस कंटाळा नाही येत? भीती नाही वाटत? त्यावर ते चिमुकले फूल म्हणाले, अरे एकटा कुठे आहे मी? सकाळ झाली की गुंजन करत भवरा येतो की आणि आजूबाजूच्या झाडांची खबरबात मला देतो. दोन घटका त्याचंही मन मोकळं होतं आणि माझंही.


वारा तर सतत माझ्याभोवती रुंजी घालत असतो. कधी झुळूक बनून तर कधी सुसाट. पावसाला तर माझी इतकी काळजी की कितीही जोरात आला तरी माझ्या अंगावर मात्र हळुवार तुषार टाकतो बघ. पुरतात मला तेव्हढे आणि सकाळची कोवळी उन्हाची तिरीप माझी ख्यालीखुशाली विचारून भरकन बाजूला होते. आता सांग कुठे मी एकटा आहे?


आज सकाळी मात्र शाळेत जाताना एका मुलाने पायाने एक दगड इतक्या जोरात उडवला, की माझा तर जीवच घाबरला. लागला नाही मला तो दगड. पण नीट निरखून पाहिलं मी त्या लेकराकडे तेव्हा रडवेला चेहरा झाला होता रे त्याचा. आई रागावली होती की काय कुणास ठाऊक.


परवा तर मजाच झाली बघ. पांढऱ्या पांढऱ्या केसांची एक आजी डुलत डुलत माझ्याजवळ येऊन थांबली आणि खुदकन हसली! मी पण हसलो... काय आठवलं असेल रे तिला? अशी सोबत होते बघ मला, मग मी एकटा कसा?


ते बघ, ते आजोबा येत आहेत ना... अरे समोर बघ ना, वेंधळाच आहेस अगदी. अरे हे जवळ येऊन थांबले आहेत ना, ते आजोबा... रोजच माझ्या जवळ येऊन थांबतात, मग डोळे पुसत पुसत पुढे निघून जातात. मला पण वाईट वाटतं बघ. पण विचारणार कसं? कुणाच्या आठवणीने असे उदास होत असतील रे? पाहिलंस, किsssती वेळ झाला तुझ्याशी गप्पा मारत बसले आहे मी. तू तुझ्या बाटलीमधलं पाणी दिलंस मला आणि फोटो तर सतत काढतच आहेस. कसे आले आहेत ते फोटो?


आता नाही ना मी एकटा वाटत? अरे एकटं कुणी नसतच या जगात. माणसं, झाडं, प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, चांदण्यांनी भरलेलं आभाळ कळलं...!


आणि एक सांगू एकटं असलं तरी चालतं रे पण कुणी एकाकी होऊ नये इतकच...!

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका