पण गावातील महिलांना दिला जातो त्रास
मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. महापालिका आणि पोलिसांच्या या कारवाईमुळे दादर पश्चिम परिसर मोकळा झाल्याने स्थानिकांसह प्रवाशी आणि पादचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
परंतु ही कारवाई केली जात असली तरी रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या आतमध्येच फेरीवाले व्यवसाय करताना दिसत असून स्थानकापासून सुमारे २०० मीटर लांबीवर व्यवसाय करणाऱ्या गावातून भाजी आणून त्याची विक्री करणाऱ्या महिलांवर कारवाईचा कायमच बडगा दाखवला जात आहे. एका बाजूला भाडोत्री आणि परप्रांतिय फेरीवाले महापालिका आणि पोलिसांना जुमानत नसताना मराठी महिलांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे हीच का ती महापालिकेची कारवाई असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दादर पश्चिम भागात मागील ६ मेपासून पोलीस आणि महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे.
ही कारवाई रेल्वे स्थानकापासन दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे; परंतु दीडशे मीटर परिसरासह पुढील सर्व भागांतील रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करुन फेरीवाला मुक्त दादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु या कारवाईमध्ये केळकर मार्गावर बसणाऱ्या मुंबई बाहेरील ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांवरही कारवाई केली जात असून त्यांना मागील ५० वर्षांपासून व्यवसाय करत असलेल्या जागेवर हटवले जात आहे.
आज भाजी विक्री करणाऱ्या या महिला दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील आहेत. या भागात भाजी विक्री करणाऱ्या महिलांच्या मुलगी, सून आदी असून दादरमध्ये फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा फटका या शेतकरी महिलांनाही पडत आहे. या महिला दोन ते अडीच तासांचा प्रवास करता भाजी विक्रीला आणत असतात आणि रात्रीची ठराविक गाडी पुन्हा पकडून जाण्यासाठी आठ ते साडेआठ वाजता व्यवसाय बंद करत असतात. त्यामुळे केवळ चार ते पाच तासच या महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने महापालिकेने जप्त केलेली भाजीही ते सोडवण्याचा प्रयत्नकरत नाहीत.
परंतु मागील एक महिन्यापासून दीडशे मीटर परिसरात नसतानाही त्यांच्या मूळ जागेवरुन हटवले जाते, परंतु त्याच ठिकाणी कपडे आणि अन्य वस्तूंची विक्री करणारे मात्र व्यवसाय करताना दिसतात.
या महिला भाजी विक्री करणाऱ्या महिलांचे फोटो काढून त्यांना नाहक त्रास दिला जातो आणि दुसरीकडे भाडोत्री, परप्रांतीय फेरीवाले महापालिका आणि पोलिसांना न जुमानता व्यवसाय करताना दिसतात, दुसरीकडे या महिला घाबरुन तसेच पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मान देत मूळ जागा सोडून आडबाजुला जावून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे महापालिका आणि पोलिस या मराठी शेतकरी महिलांना दादरमधून पिटाळून लावून या जागेवर परप्रांतियांना या जागा देण्याचा प्रयत्न तर करत नाही असा प्रश्न आता येथील रहिवाशांनाच पडू लागला आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या महिला शेतकऱ्यांचा कुणालाही त्रास नसून एकमेव शिस्तीत आणि एका रांगेत या महिला भाजीचा व्यवसाय करतात. पण याच महिलांना पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी कारवाई करत असल्याने नक्की महापालिका आणि पोलिसांची हीच कारवाई आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.