स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोर्चे बांधणी सुरू
विरार : भारतीय जनता पक्षाच्या ५० प्राथमिक सदस्यांची नोंदणी करणारा "सक्रिय सदस्य" हा "फंडा" वापरून घराघरात पोहोचणाऱ्या भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक दृष्टीने सुद्धा वेगळा प्रयोग हाती घेतला आहे. नुकत्याच निवडण्यात आलेल्या मंडळ अध्यक्षाच्या मंडळ समितीत अध्यक्षासह तब्बल ६१ जणांचा समावेश करण्याबाबत राज्यातील सर्व मंडळ अध्यक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपाने बूथ प्रमुख, बूथ समित्या, शक्ती केंद्रप्रमुख, मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या निवडीसाठी राज्यभर संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम लावला. वय वर्ष ४५ पेक्षा जास्त असणारा मंडळ अध्यक्ष नको, तर ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेला जिल्हाध्यक्ष नको अशी आचार संहिता मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी लावून दिली. आणि अपवादात्मक परिस्थिती सोडता राज्यात बहुतांश ठिकाणी ती यशस्वीपणे राबविण्यात आली. एससी, एसटीच्या नागरिकांना प्राधान्य, महिलांना प्राधान्य देण्याबाबत सुद्धा बूथ समितीपासून तर प्रदेश परिषद सदस्य निवडण्याच्या सर्व प्रक्रियेत ही बाब प्रामुख्याने राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
भाजपाची ५० सदस्य नोंदणी करणारा भाजपाचा "सक्रिय सदस्य" असेल आणि सक्रिय सदस्याला पक्षात मानाचे स्थान राहील ही बाब सर्वत्र रुजवून भाजपाने जिल्हा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली आहे. त्यानंतर मंडळात असलेल्या एकूण बूथ पैकी ५१ टक्के बूथ समित्यांची रचना करण्यात आली आहे. बूथ समित्यांमध्ये सुद्धा बारा सदस्यांपैकी तीन महिला असणे अनिवार्य करण्यात आले होते. त्याचप्रमाणे एससी एसटी प्रवर्गाला प्राधान्य देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या होत्या. एकंदरीतच समाजातील प्रत्येक घटकाला भाजपासोबत जोडण्याचे काम करण्यात येत असताना, आता राज्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी सुद्धा संघटनात्मक शक्ती वाढविण्याच्या माध्यमातून केली जात आहे.
प्रत्येक मंडळामध्ये ४५ कार्यकारणी सदस्यांसह २ सरचिटणीस, ६ उपाध्यक्ष, ६ सचिव आणि १ कोषाध्यक्ष अशा प्रकारे ६० आणि मंडळ अध्यक्ष धरून ६१ जणांची मंडळ समिती राहणार आहे. मंडळात येणाऱ्या प्रत्येक भागातील घटकांचा मंडळ समितीमध्ये समावेश करण्याबाबत, तसेच महिला व एससी एसटीच्या प्रवर्गातील नागरिकांना प्राधान्य देण्याचे काम या समितीमध्ये सुद्धा करण्यात येणार आहे. लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून अशाप्रकारे "ग्राउंड लेव्हलवर" मोर्चे बांधणी करण्यात येत आहे .
भाजपामध्ये बूथ समितीपासून तर केंद्रीय अध्यक्षांपर्यंत सर्वांची निवड संघटनात्मक निवडणुकीच्या माध्यमातून केल्या जात आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष असून, मंडळ समिती असो की जिल्ह्याची कार्यकारणी पक्षासाठी काम करणाऱ्या सर्वांना योग्य तो सन्मान दिला जाईल.
- प्रज्ञा पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजपा वसई-विरार