मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय. सततच्या घडणाऱ्या गोष्टीमुळे आपलं मन इतकं घट्ट झालंय की आता या गर्दीनं कितीही बळी गेले तरी आपल्याला कुठे काय फरक पडतोय. आपले सगळ्यांचे पहिले पाढे पंचावन्न सुरूच आहेत. कधीतरी या जगाला ओरडून सांगावंसं वाटतं, अरे, मरण खरंच इतकं स्वस्त झालंय का रे, की आपण या गर्दीच्या प्रवाहात सरळं सोडून येतोय.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाची दुर्घटना घडून दोन दिवस झाले. दुर्घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली, काहींचे डोळेही भरून आले असतील. काहींनी आपलं दु:ख व्यक्त केलं...संपलं. दोन दिवसांत सारं काही पुढे गेलं. पण हे असं का घडतंय...आपण इतके कठोर हृदयाचे झालो आहोत का, की माणसाच्या मृत्यूचं काही सोयरेसुतकच राहिलं नाही. नेहमीप्रमाणं एखाद्या कार्यक्रमाला गर्दी होते. त्या गर्दीदरम्यान चेंगराचेंगरी होते आणि कित्येक नाहक बळी जातात.
बंगळूरूच्या या रोड शो दरम्यानही असंच घडलं. यात मृत्यू पावलेल्या घरच्यांना सोडलं तर इतर कोणालाही काहीही नाही हो...या दुर्घटनेत कोणी आपला कर्ता पुरुष गमावलाय तर कोणी आपला एकुलता एक लेक गमावलाय...आपण अशा या निर्दयी गर्दीचे बळी का ठरतोय? का लोकांना समजत नाहीये की अशा समारंभांना गर्दी केल्यानं आपल्या हाती काही येत नाही...केवळ आपला जीवच जातो आणि आपण आपला जीव असा स्वस्तात का गमवावा.
मुंबई : मुंबईहून लातूरकडे जाणाऱ्या एलटीटी-नांदेड एक्स्प्रेसमधील एक घटना बुधवारी पहाटे कांजुरमार्ग स्टेशनच्या जवळ घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र ...
आयपीएलचा सामना ज्या संघानं जिंकला त्यांच्यावर कोट्यावधी पैशांचा वर्षाव झाला. त्यांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या यंत्रणा...आयपीएलचे आयोजन करणारे तितकेच कोट्याधीश आणि सुरक्षित...मग तुम्ही-आम्ही सामान्य लोक याचे बळी का ठरतोय...या रोड शोमध्ये गर्दी करण्याच्या नादात ज्यांनी आपला जीव गमावलाय त्यांच्या घरच्यांचे काय... आयपीएल आता संपली, पुढच्या वर्षी पुन्हा सुरू होईल. मात्र ज्यांनी आपल्या माणसाला गमावलेय ती व्यक्ती परत येणार आहे का? मग असं स्वस्तात आपल्या जीवाला का जाऊ देतोय...
अशा चेंगराचेंगरीमध्ये जीव जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा बऱ्याच घटना घडल्यात.जानेवारी महिन्यात तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाली. त्यात काही भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तर गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं सत्संगादरम्यान तब्बल १२१ भोळ्याभाबड्या भाविकांनी आपले प्राण गमावले. या चेंगराचेंगरीत जर लहान मुलांचा समावेश असेल तर ती या गर्दीत उगाचच चिरडली जातात.
आपल्याकडे देवभोळ्या, क्रिकेटवेड्या लोकांची संख्या इतकी प्रचंड आहे की त्यांच्या या भोळ्या भक्ती आणि प्रेमापायी किती आणखी जीव जातील, हे तो देवंच जाणो...भारताच्या क्रिकेट टीमनं चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबईत नरिमन पॉईंटजवळ मोठी विजयी रॅली काढण्यात आली होती. इतक्या प्रचंड संख्येनं या ठिकाणी गर्दी झाली होती मात्र सुदैवानं असं काही घडले नाही... पण दुस-या दिवशी तिथं पडलेल्या चपलांचा खच सगळं काही सांगून जातो...अशा दुर्घटनांनंतर खरंतर विचार करण्याची गरज आहे... त्यामुळे सामान्य माणसा जागा हो आणि विचार कर, की खरंच या गर्दीचा बळी होणं योग्य आहे का? सामान्यांनी विचार केला तरच अशा घटना कमी होतील.