केडीएमसी क्षेत्रातील कचरा संकलन शुल्कात केलेली वाढ रद्द करा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कात तब्बल ३०० रुपयांची केलेली वाढ रद्द करण्याची मागणी कल्याण पूर्व मतदार संघाच्या भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात घनकचरा व्यवस्थापन शुल्क जे ६०० रुपये होते, त्यात ३०० रुपये वाढ करून ९०० रुपये केलेले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कचरा उचलणे व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असून त्यासाठी महानगरपालिकेने प्रथम योग्य अशी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. महानगरपालिका क्षेत्रात अजूनही जागोजागी कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ठीग साचलेले नेहमी दिसून येत आहेत.
राज्यातील इतर महानगरपालिकेच्या तुलनेत फक्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मालमत्ता कर जास्त प्रमाणात आकारला जातो, त्याच्या तुलनेत नागरिकांना कोणत्याही मुलभूत सुविधा मिळत नाहीत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांवर अन्यायकारक रित्या लादलेल्या करामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये महानगरपालिका प्रशासना विरोधात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे व याचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कात तब्बल ३००/- ची केलेली वाढ रद्द करण्याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनास प्राधान्याने आदेश देण्याची मागणी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.