रत्नागिरी (वार्ताहर) : कोकण रेल्वे मार्गाच्या सुरक्षितेसाठी पावसाळी हंगामातील गाड्यांच्या वेळा आणि वेगावर मर्यादा येणार आहे. यंदा कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या ४२ गाड्यांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत. नवीन वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. मुंबईतील स्थानकांतून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल नसला तरी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकात येणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल आहे.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या एक ते दोन तास लवकर येणार आहेत. या वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेगात ताशी ५० किलोमीटर असा बदल होणार आहे. यंदा पहिल्याच पावसात विलवडे स्थानकादरम्यान दरड कोसळली होती. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पावसात कोकण रेल्वे सुरक्षित राहिली. गाड्यांचा वेगही सुसाट होता; मात्र, येत्या काळात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने दक्षता घेत यंदा वेळापत्रकात बदल केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाच्या ४२ गाड्यांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत. नवे वेळापत्रक एर्नाकुलम जंक्शन ते पुणे (२२१४९) एर्नाकुलमहन पहाटे ५:१५ वाजता ऐवजी मध्यरात्री २:१५ वाजता निघेल. एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन (२२६५५) एर्नाकलमाहन ५ः१५ ऐवजी ०२:१५ वाजता निघेल. मडगाव से मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस (१०१०७) मडगावहून पहाटे चारऐवजी ४.४० वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम उत्तर ते योगनगरी ऋषिकेश (२२६५९) तिरुवनंतपुरम उत्तर येथून सकाळी ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम (१२२१७) उत्तर चंदीगडला जाणारी गाडी तिरुवनंतपुरम (उत्तर) कडून सकाळी ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता निघेल.