राज्य कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील कृषी महाविद्यालय यांच्या सहकार्याने कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आलंय. कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी तांत्रिक सहाय्य घेण्याबरोबरच खते, पाणी यांचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येणारेय. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन कसं वाढेल, याचं मंथन या तीन दिवसात केलं जाईल.या उपक्रमात सुमारे दोन हजार शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आमंत्रित केलंय.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितल की, पुण्यातील कृषी महाविद्यालयात होणाऱ्या या ‘कृषी हॅकेथॉन’चं १ जून २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन होईल. ३ जून रोजी समारोप होणार असून यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार आहेत.
हॅकेथॉनमध्ये सव्वातीन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणारआहेत. विजेत्यांना विषयवार रोख परितोषिकं तसेच अग्रगण्य कृषी स्टार्टअप इनक्युबेटरकडून प्राधान्यानं इन्क्युबेशन व निधी साह्य दिले जाणार आहे. या उपक्रमात आतापर्यंत एक हजार 800 जणांनी सहभाग नोंदवलाय. त्यातून ५६० जणांनी त्यांचं प्रेझेंटेशन दिलंय. त्यापैकी १४० जणांची निवड झालीय. यापैकी आठ गटांत प्रत्येकी दोघांची पुरस्कारासाठी निवड होणार आहे. या हॅकेथॉन स्पर्धेत आठ क्षेत्रांतील विजेत्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये, तर द्वितीय विजेत्याला प्रत्येकी पंधरा लाख रुपये देण्यात येतील. हॅकेथॉनमध्ये एआयचा वापर करून शेतीचं सक्षमीकरण कसं करायचं या बद्दलची प्रकल्प देखिल सादर होणार आहेत.
लहान व अल्पभूधारक शेतक-यांसाठी कमी खर्चीक, सोपे व परिणामकारक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), डेटा अॅनालिटिक्स यांचा शेतीमध्ये वापर करणे, हवामान बदल, पाणीटंचाई यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर उपाय शोधण्याचा या मागचा उद्देश असणार आहे.