नवी दिल्ली: सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुरुग्राम येथील शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता पोलिसांनी अटक केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणौतने मोठं वक्तव्य केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली एखाद्याचा छळ करणे चांगले नाही अशी टीका कंगणाने पश्चिम बंगाल सरकारवर केली आहे. "कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली एखाद्याचा छळ करणे चांगले नाही." असे देखील ती पुढे म्हणाली.
कंगनाने शर्मिष्ठा पानोलीला लवकरात लवकर मुक्त करावे अशी मागणी देखील केली आहे. ती म्हणाली, "तिने जर माफी मागितली आहे आणि पोस्ट डिलीट केली आहे, तरीसुद्धा तिला तुरुंगात टाकणे, तिचा छळ करणे, तिचे करिअर संपवणे आणि तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणे हे खूप चुकीचे आहे. हे कोणत्याही मुलीसोबत घडू नये. मी पश्चिम बंगाल सरकारला विनंती करते की त्यांनी राज्याला उत्तर कोरिया बनवण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहेत. तिने तिच्या अश्लील वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तिने सर्वसाधारणपणे सर्व काही सांगितले होते. आजची पिढी अशी भाषा अगदी सहज वापरते. त्यामुळे तिला लवकरच सोडण्यात यावे, तिच्यासमोर तिचे संपूर्ण करिअर आणि आयुष्य आहे."
केवळ कंगनाच नाही तर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता पवन कल्याण यांनीही पानोलीच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आणि कथित सांप्रदायिक व्हिडिओवरून कोलकाता पोलिसांनी केलेल्या अटकेचा निषेध केला. त्यांच्या मते, 'धर्मनिरपेक्षता ही दुतर्फा असली पाहिजे'. ते म्हणाले की "ईश्वरनिंदा निषेधार्ह असली पाहिजे," परंतु धर्मनिरपेक्षतेचा वापर "ढाल" म्हणून करू नये.
काय आहे नेमके प्रकरण?
शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता हा व्हिडीओ दिसत नाही. या व्हिडीओत 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात बोलताना शर्मिष्ठाने बॉलिवूड सेलिब्रेटी आणि विशिष्ट धर्माच्या नागरिकांवर टीका केली होती. या व्हिडीओ प्रकरणी कोलकाता येथे एक तक्रार दाखल झाली. यानंतर कोलकाता पोलिसांनी कारवाई केली आणि शर्मिष्ठाला अटक केली.
बॉलिवूड सेलिब्रेटी चित्रपटात देशासाठी बलिदान देण्याची भाषा करतात. पण ऑपरेशन सिंदूर सुरू होते त्यावेळी सरकारच्या बाजूने आणि पाकिस्तान विरोधात बोलण्याची हिंमत अनेक कलाकारांनी दाखवली नव्हती. हे निरीक्षण नोंदवत शर्मिष्ठाने व्हिडीओद्वारे बॉलिवूड सेलिब्रेटी आणि विशिष्ट धर्माच्या नागरिकांवर टीका केली होती. ऑनलाईन आक्षेप वाढल्यावर शर्मिष्ठाने एक नवा व्हिडीओ केला आणि ज्यांची मनं दुखावली अशा सर्वांची तिने माफी देखील मागितली होती. पण या माफीनाम्याने वाद शमला नाही. प्रकरण आणखी चिघळले आणि कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाला अटक केली.