पूर्वोत्तर भारतात मुसळधार, भूस्खलनात १९ जणांचा मृत्यू, हजारो कुटुंबं बाधित

गुवाहाटी : पूर्वोत्तर भारतात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि त्यातून झालेल्या भूस्खलनामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. मणिपुर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये पावसाचा प्रकोप आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून १२,००० हून अधिक कुटुंबांना बाधा पोहोचली आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. हवामान विभागाने या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.


मिझोराममध्ये भूस्खलनाचा जबरदस्त फटका बसला आहे. लॉन्गतलाई शहरात एका डोंगर उतारावरून मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याने पाच घरे आणि एक हॉटेल जमीनदोस्त केली. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असून, बचावकार्य सुरू आहे. यंग लाई असोसिएशन, आपत्ती व्यवस्थापन दल आणि तिसऱ्या भारतीय राखीव बटालियनचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. या भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग-५४ बंद झाला असून, लॉन्गतलाई आणि सियाहा या दोन भागांमधील संपर्क पूर्णतः तुटला आहे.


आसाममध्ये कामरूप मेट्रो जिल्ह्यातील भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. गुवाहाटी, सिलचरसह पाच जिल्ह्यांतील १२,००० लोकांना पुराचा फटका बसला आहे. लखीमपूरमध्ये रिंगबांध फुटल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या २४ तासांत गुवाहाटीत ९० ते १३४ मिमी पाऊस पडला असून, पुढील काही दिवसातही पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



अरुणाचल प्रदेशात भूस्खलनाने सर्वाधिक ९ जणांचे प्राण घेतले. पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाना-सेप्पा मार्गावर ७ जणांचा मृत्यू झाला, तर लोअर सुबनसिरी जिल्ह्यात २ मजुरांचा मृत्यू झाला. सिगिन नदी धोक्याच्या पातळीवर आहे. हवामान खात्याने १ ते ५ जूनदरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.


त्रिपुरात देखील पावसाचा जबरदस्त परिणाम दिसून आला. येथे पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. १०६ घरे उद्ध्वस्त झाली असून, २०० हून अधिक लोक बेघर झाले आहेत. हावड़ा नदीचा पाण्याचा स्तर १०.०१ मीटर वर गेला आहे.


मणिपुरमध्ये नम्बुल, इरिल आणि इम्फाल या प्रमुख नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. टेंग्नौपाल, उखरुल आणि सेनापती जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


या मुसळधार पावसाने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्वोत्तर भारतात जनजीवन विस्कळीत झाले असून, सरकार आणि बचाव यंत्रणा रात्रंदिवस मदतकार्य करत आहेत. मात्र, हवामान खात्याचा पुढील काही दिवसांचा अंदाज पाहता संकट अद्याप टळलेले नाही.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन