
रवींद्र तांबे
मागील आठ ते दहा वर्षांमध्ये आपल्या राज्यात जून महिना संपत आला तरी पुरेसा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी राजाला दुबारा पेरणी करावी लागली होती. यात अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. यावेळी अगदी मे महिन्याच्या प्रारंभापासून पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत दिसत आहे. शेतीची कामे सोडा. हातातोंडाला आलेल्या पिकाला सुद्धा शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागणार आहे. तसेच कोपऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे पिकलेली पिके कुजणार आहेत. याचा परिणाम शेतकरी दादांच्या उत्पादनात घट होणार हे मात्र नक्की. मग संसार चालणार कसा...! तेव्हा मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असली तरी शेतात पाणी साचल्यामुळे उन्हाळ्यात पिकलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात कोकण रेल्वेने मुंबईला येताना बऱ्याच ठिकाणी पिकलेले भात वाफ्यात पाणी साचल्यामुळे पाण्यात तरंगताना दिसत होते. काही वाफ्यात भात कापून पसरून ठेवले होते. तेव्हा अशा भाताला कोंब येणार. म्हणजे शेतकरी दादांची उन्हाळी मेहनत पूर्ण पाण्यात जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसानभरपाई मिळायला हवी. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नैसर्गिक नुकसान झाले असेल त्यांचे पंचनामे करून योग्यती कारवाई शासन पातळीवर होणे गरजेचे आहे. म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळाल्यामुळे पुढील शेतीची कामे करणे सोयीचे होईल. यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक शासनमान्य असायला हवा. तरच त्यांना शासकीय विविध योजना व अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवले नसेल तर आपल्या जिल्ह्यातील नागरी सुविधा केंद्रावर तयार करून घ्यावे.
सध्याच्या बदलत्या हवामानाचा विचार करता शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान होत आहे. ही परिस्थिती शेतीप्रधान देशाला पोषक नाही. उन्हाळ्यामधील मे महिना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीचा काळ. जमिनीची मशागत करण्यापूर्वी शेत जमिनीत पाणीच पाणी. मग मशागतच झाली नाही, मग सांगा पेरणी कशी करणार. त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकरी चिंतेत असू नये म्हणून विविध माध्यमांच्या माध्यमातून बातम्या प्रसारित करण्यात येत आहेत.
कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने सन २०२५-२६ या खरीप हंगामासाठी जिल्हा व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठाची गुणवत्ता, शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण व योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. असे जर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात झाले तर शेतकरी राजाला अधिक बळ येईल.
महत्त्वाची बाब म्हणजे, शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. पुढील दोन आठवड्याने हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे असे आवाहन राज्यातील कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केले आहे. यात कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त धोका आहे. जर पेरणी केली तर राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे ५ जून नंतर मान्सून थांबल्यास दुबारा पेरणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येईल. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे असे वाटत असले तरी कोरडवाहू जमीन सोडून नदी नदीकाठच्या ज्या शेतजमिनी आहेत तेथे भाताची पेरणी करायला काहीच हरकत नाही त्यासाठी प्रथम लागवड करून नंतर पेरणी करावी. त्यासाठी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास अधिक उत्तम होईल.
कोकणातील शेतकऱ्यांच्या मते, एकदा जमीन थंड झाली की, पेरणी करून सुद्धा भात रुजून येत नाही. पाऊस पडल्या पडल्यास पेरणी केल्यास पेरलेले भात रुजून येते. मात्र नंतर पावसाने पाठ फिरवता कामा नये. यासाठी मशागत महत्त्वाची असते असे सांगायला विसरत नाहीत. हा आहे अनुभव. बऱ्याच वेळा शेतीसाठी अनुभव उपयोगाचा असतो. तेव्हा मे महिन्याचा विचार करता पावसाचे लवकर आगमन झाल्याने शेतीच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाचा सल्ला घेणे शेतकऱ्यांना जास्त हिताचे ठरणार आहे. जर नैसर्गिक आपत्ती आल्यास शासनच आर्थिक मदत करणार आहे. कायद्याचा विचार करता शासकीय स्तरावरील मार्गदर्शन लाभदायक ठरेल. तेव्हा केव्हाही पुस्तकी ज्ञान अधिक मार्गदर्शक ठरते. असे असले तरी आता जरी कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला तरी अंदाजे मान्सूनचे आगमन या वर्षी लवकर होण्याची शक्यता आहे असे जरी वर्तविले असते तर शेतकऱ्यांनी आपली लागवडीची कामे लवकर करून घेतली असती. तेव्हा राज्यातील कृषी तसेच हवामान विभागाने सतर्क राहाणे योग्य आहे. कारण शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे विसरून चालणार नाही.
तेव्हा या वर्षी शेतकऱ्यांच्या ध्यानीमनी नसताना सुद्धा लवकर पावसाने हजेरी लावली मात्र कालपासून थोडी विश्रांती घेतल्यासारखी वाटत आहे. याचा परिणाम राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गावांचा सुद्धा संपर्क तुटला आहे. आता मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीची कामे खोळंबल्यामुळे शेतकरी राजाची चिंता वाढली आहे. यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जरी जाहीर केली तरी झालेले नुकसान भरून येणार नाही. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करता कृषी व हवामान विभागाने वेळच्या वेळी शेतकऱ्यांना सूचना तसेच सल्ला देणे राज्याच्या हिताचे ठरेल. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांनी आपली कामे वेळच्या वेळी केल्यास शेतीची कामे खोळंबणार नाहीत.