कल्याण-डोंबिवलीत वर्षभरात चौदा हजार नागरिकांना श्वानदंश

कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत दिवसेंदिवस भटक्या श्वानांचे प्रमाण वाढत आहे. या भटक्या श्वानांनी सन २०२४-२०२५ या वर्षभराच्या कालावधीत पालिका हद्दीतील १४ हजार २४८ नागरिकांना दंश केला आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली परिसरातील सुमारे ३६ हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला आहे. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून ही माहिती उपलब्ध झाली आहे.


कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे ८० हजारांहून अधिक भटके श्वान आहेत. या भटक्या श्वानांच्या पिसाळल्याच्या, दंश करत असल्याच्या वाढत्या तक्रारी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे आल्या की त्या श्वानांना पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण, लसीकरणच्या प्रक्रिया वेळोवेळी पार पाडण्यात येतात. रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना ते पायी असताना, रिक्षा, दुचाकीवर असताना भटके श्वान त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना दंश करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या काही भागातून रात्रीच्या वेळेत प्रवास करणे भटक्या श्वानांमुळे जोखमीचे झाले आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.



श्वान दंश झाल्यानंतर नागरिकांना पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयांमध्ये, आरोग्य केंद्रांमध्ये श्वान दंश प्रतिबंधित लस उपलब्ध करून देण्यात येते. सन २०२२-२०२३ मध्ये कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील १६ हजार ४१४ नागरिकांना श्वान दंश झाला. यामध्ये लहान बालकांचाही सहभाग आहे. २०२३-२०२४ मध्ये २० हजार ३९० नागरिकांना श्वान दंश झाला, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक कमलेश सोनवणे यांनी दिली. २०२४-२५ मध्ये १५ हजार ४४५ श्वानांवर निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर्षी ३९६ श्वानांना रेबिज झाले होते, असे आरोग्य निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले. खासगी दवाखान्यांमध्ये श्वान दंश उपचार घेतले तर एका इंजेक्शनसाठी सुमारे सातशे ते आठशे रूपये मोजावे लागतात. श्वान दंश झाल्यावर पालिकेत मोफत उपचार केले जातात. त्यामुळे बहुतांशी नागरिकांचा ओढा पालिकेत असतो, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


भटक्या श्वानांवर निर्बिजीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी कल्याणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ एक केंद्र आहे. येथे उपचाराच्या सर्व सुविधा आहेत. असेच एक केंद्र डोंबिवली एमआयडीसी भागात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना श्वान दंश झाल्यावर त्यांच्यावर जखमेप्रमाणे पालिका रुग्णालय, दवाखान्यांमध्ये तातडीने उपचार केले जातात.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे