मुंबई: सोमवारी मुंबईसह महाराष्ट्रात धुंवाधार पाऊस बरसला. या जोरदार पावसामुळे संपूर्ण मुंबईची वाहतूकव्यवस्था कोलमडली होती. ठिकठिकाणी पाणी जमा झाल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ झाली. दरम्यान, सोमवारी जोरदार बरसल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे.मात्र तरीही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे.
मुंबईमध्ये रस्ते वाहतूक व्यवस्थित सुरू आहे तर लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, सोमवारच्या पावसानंतर मुंबईतील वातावरण थंडावले आहे. हवामान विभागाने आजही मुंबईला पिवळा अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे.
मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असली तरी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, हिंगोली, नांदेड, परभणी तसेत रायगड येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मच्छिमारांनी या दरम्यान समुद्रामध्ये जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा
जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.